Nitin Gadkari : नागपूर शहरात ‘हरघर तिरंगा’ मोहिमेला शुभारंभ, नितीन गडकरींनी त्यांच्या निवासस्थानी फडकविला तिरंगा

| Updated on: Jul 23, 2022 | 8:17 AM

राष्ट्रध्वज उतरवल्यानंतर व्यवस्थित आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तिरंगा फडकवताना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहील याची काळजी घ्यावी.

Nitin Gadkari : नागपूर शहरात हरघर तिरंगा मोहिमेला शुभारंभ, नितीन गडकरींनी त्यांच्या निवासस्थानी फडकविला तिरंगा
नितीन गडकरींना त्यांच्या निवासस्थानी फडकविला तिरंगा
Follow us on

नागपूर : संपूर्ण देशात 13 ते 15 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ आज केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला. यावेळी केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग (Khadi Village Industry) आयोगाचे सदस्य जयप्रकाश गुप्ता व जिल्हाधिकारी आर. विमला उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी घरावर लावण्यात येणारा झेंडा त्यांच्या हस्ते फडकावून हा प्रारंभ करण्यात आला. नागपूर शहरात सात लाख घरांमध्ये ‘हर घर तिरंगा ‘ (Har Ghar Tricolor) अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात बारा लाख तिरंगा लावण्यात येणार आहे. या अभियानाची पूर्तता करण्याबाबत यावेळी नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी आर. विमला यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत हर घर तिरंगा अभियानासाठी जिल्हा प्रशासनाने (District Administration) केलेल्या तयारीची माहिती दिली. मोठ्या प्रमाणात ध्वज उपलब्ध व्हावेत यासाठी बचत गटांमार्फत निर्मिती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात झेंडा निर्मितीसाठी ग्रामीण भागातील बचत गट कार्यरत झाल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी ध्वजसंहिता पाळावी यासाठी विविध माध्यमातून ‘हरघर तिरंगा ‘ लावताना काय काळजी घ्यावी, झेंडा कसा लावावा, याबाबतही सार्वत्रिक प्रबोधन सुरू झाले. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात चित्रफीत, ध्वनिफीत, पत्रके तयार केली आहेत. त्याचे वितरण सर्वत्र सुरू असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

ध्वजसंहितेचे पालन करा

राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये. यासाठी आपल्या घरावर तिरंगा कसा लावावा, याबाबत ध्वज संहिते माहिती दिली आहे. या ध्वजसंहितेचे सर्व नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. ध्वजसंहितेनुसारआपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशीनद्वारे तयार केलेला असावा. सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरी पासून तयार केलेला तिरंगा चालेल. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. राष्ट्रध्वजाचा अर्थात तिरंगाचा आकार हा आयताकृती असेल. तसेच त्याची ठेवन 3 : 2 या प्रमाणात ठेवावी. ध्वज फडकविताना हवामान कसेही असले तरी तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावा. म्हणजेच दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या तीनही दिवशी रोज सकाळी फडकवावा आणि सूर्यास्तावेळी रोज उतरावा. घरी लावलेल्या झेंड्याबाबतही हे आवश्यक आहे.

महत्त्वाचे काय नियम

राष्ट्रध्वज उतरवल्यानंतर व्यवस्थित आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तिरंगा फडकवताना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहील याची काळजी घ्यावी. यात चूक केल्यास तो तिरंग्याचा अवमान समजण्यात येतो. राष्ट्रीय ध्वज लावताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा. त्याला स्तंभाच्या मध्ये अगर खाली किंवा इतरत्र लावू नये. राष्ट्रध्वज लावताना, इतर सजावटी वस्तू लावू नये, केवळ फडकवण्याआधी त्यात फुलं किंवा पाकळ्या ठेवण्यास मनाई नाही. तसेच राष्ट्रध्वज उतरवताना पूर्ण सावधानतेने आणि सन्मानाने हळूहळू उतरवावा. ध्वजावर कोणते प्रकारचे अक्षर चिन्ह लावू नये. तसेच ध्वज स्तंभाच्यावर अथवा आजूबाजूला काही लावू नये. ध्वज जमिनीपासून उंचावर लावावा. ध्वज जाणून-बुजून जमिनीवर अगर पाण्यामध्ये बुडणार नाही अशा पद्धतीने लावावा. राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायाकरिता करता येत नाही. तसेच त्याची अवहेलनाही करणं दंडनीय अपराध आहे.

हे सुद्धा वाचा