महाराष्ट्राला पावसानं झोडपलं; पुणे, मुंबईत जनजीवन विस्कळीत, लोकल सेवाही कोलमडली
राज्याला पावसाने झोडपून काढलं आहे. मुंबईमध्ये तर पावसानं धुमाकूळ घातला आहे. गेल्या अनेक तासांपासून मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसह अन्य काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत गेल्या काही तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे नोकरदार वर्गाचे चांगलेच हाल सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचं पाणी साचल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील पाणी टंचाई आता दूर होणार आहे. पवईचा विहार तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. आज मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर पवईचा विहार तलाव ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे.
नवी मुंबईला पावसाचा तडाखा
नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे. लोकल सेवेचं वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा सध्या 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावत असून वाशी, नेरूळ, सीबीडी बेलापूर, सीवूड्स, खारघर आणि पनवेल स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. रेल्वे रुळांवरील प्रतिकूल परिस्थिती, कमी झालेली दृश्यमानता आणि काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे लोकल सेवा मंदावली असून, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कल्याणमध्ये मुसळधार पाऊस
कल्याण शहराला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. कल्याण पूर्वेत गल्लीचे नदीत रूपांतर झालं आहे. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे चेतन पार्कच्या रहिवाशांचा घराबाहेर पडण्याचा आणि घरी परतण्याचा मार्ग बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील काकाचा ढाबा परिसरातील चेतन पार्क इमारतीसमोरील गल्लीला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे रहिवाशांना इमारतीत पोहोचणे आणि घराबाहेर पडणे अत्यंत कठीण झाले आहे. सुमारे 30 ते 40 कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आहेत, मात्र या इमारतीकडे जाणारा मुख्य रस्ताच पाण्याखाली गेला आहे. पाटील नगर आणि काकाचा ढाबा रोडवरून येणाऱ्या नागरिकांना कंबरभर पाण्यातून मार्ग काढत घर गाठावे लागत आहे.इमारतीच्या तळमजल्यावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे नुकसान झाले असून रहिवासी चिंतेत आहेत. अनेक रहिवासी बाहेरच अडकून पडले असून पाण्याची पातळी कमी होण्याची वाट पाहत आहेत.
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस
ठाणे जिल्हा आणि आसपासच्या शहरांची तहान भागवणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात अखेर पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. आज सकाळपासूनच धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, अवघ्या ९ तासांत तब्बल १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत ४ फुटांची लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळपासून धरण क्षेत्रात संततधार आणि मुसळधार पाऊस सुरूच आहे. गेल्या काही दिवसांत पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा खालावला होता, ज्यामुळे पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आज झालेल्या दमदार पावसामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
अंबरनाथमध्ये नदीला पूर
अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अंबरनाथ येथील वालधुनी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दरम्यान या नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात काही लहान मुलं स्टंट करताना दिसत आहेत, मात्र प्रशासनाचं इकडे लक्ष नसल्याचं पहायला मिळत आहे, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पनवेलमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे तळोजा परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मात्र दुसरीकडे भर पावसात ट्राफिक पोलीस आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत, वाहतूककोंडी पासून नागरिकांची सुटका करत आहेत.
पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोन ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एक घटना जुन्नर तालुक्यातील इंगळून घाटात घडली आहे, दरड आणि माती रस्त्यावर आल्यानं दुपारी दीड पासून या मार्गावर एका मार्गिकेवरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे. तर दुसरी घटना ही लोणावळा लगत कातळ धबधब्याशेजारच्या मार्गावर घडलीये. दुपारी पडलेली ही दरड जेसीबीद्वारे हटवली जात आहे. लोणावळ्यात तुफान पाऊस सुरू आहे. गेल्या 9 तासांमध्ये तब्बल 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळी 8 पासून पावसाने जोर धरला असून, संध्याकाळच्या पाचपर्यंत या भागात पाऊस सुरूच होता. विकेएंडला लोणावळ्यात आलेले पर्यटक पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.
गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात पुन्हा सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात आता धरण साठ्यात मोठी वाढ झाली असून जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क रहावे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
जळगावात तुफान पाऊस
जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला जोरदार पावसाने झोडपून काढलं आहे. चाळीसगाव शहरात सुमारे दीड तास मुसळधार पाऊस सुरू होतो, संततधार पावसाने शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे.काही काळ जनजीवन विस्कळीत झालं होतं.
पालघरला पावसाने झोडपलं
दरम्यान दुसरीकडे पालघरल जिल्ह्याला देखील पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. विरार, वसई सारख्या शहरांमध्ये अति पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर गुढघ्यापेक्षाही जास्त पाणी साचलं आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत, नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
