समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर हिंगोली आरटीओने घेतला मोठा निर्णय, अंमलबजावणीही सुरू; इतर जिल्ह्यांचे काय?

| Updated on: Jul 02, 2023 | 11:49 AM

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे काल रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातानंतर हिंगोलीतील आरटीओ प्रशासन खडबडून जागं झालं आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर हिंगोली आरटीओने घेतला मोठा निर्णय, अंमलबजावणीही सुरू; इतर जिल्ह्यांचे काय?
buldhana bus accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हिंगोली : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर काल भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. तसेच वेगावर नियंत्रण नसल्यामुळेही हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. समृद्धी महामार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणं जीवघेणं ठरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच या महामार्गावरील वेगमर्यादेवरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीकाही केली आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली आरटीओने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघात झाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात 25 प्रवाशांनी आपला जीव गमावलाय. त्यानंतर आता ट्रॅव्हलच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हिंगोलीत आज सकाळपासूनच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी औंढा नागनाथ – हिंगोली या मार्गावर पुण्यावरून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या प्रत्येक खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

तोपर्यंत रस्त्यावर फिरू देणार नाही

ही तपासणी करत असताना जवळपास 10 ते 12 ट्रॅव्हल्सने नियम मोडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करून समज देण्यात आली आहे. अनेक ट्रॅव्हल्समध्ये Fire extinguisher नव्हते. नियमांचे पालन न करणाऱ्या ट्रॅव्हल्सला रस्त्यावरून फिरू देणार नसल्याच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जगदीश माने यांनी सांगितले. हिंगोली आरटीने हा मोठा निर्णय घेतल्याने आता वेगाने आणि नियमबाह्य पद्धतीने वाहने चालवणाऱ्या चालकांना चाप बसणार आहे.

स्कूल बसवरही कारवाई

या वाहन तपासणीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. अनेक वाहनांमध्ये अग्निशमन यंत्रे नव्हती. एमर्जन्सी डोअरजवळ सीट ठेवल्या होत्या. त्यामुळे या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना समजही देण्यता आली आहे. तसेच अवैध वाहतूक करणाऱ्यांना आणि वाजवीपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. एका पथकाने तर इंग्लिश स्कूलच्या बसवरही कारवाई केली आहे. हिंगोलीनंतर आता इतर जिल्ह्यातही आरटीओ सक्रिय होण्याची शक्यता आहे.

कसा झाला अपघात

काल नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसला बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा येथे अपघात झाला. समृद्धी महामार्गावरून जात असताना बस खांबाला धडकली. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्र सुटलं. त्यामुळे बस थेट डिव्हायडरला जाऊन धडकली आणि बसची टँक फुटली. त्यानंतर ही बस पलटी झाली आणि घसरत जाऊन दूरवर टँकचा स्फोट झाला. त्यामुळे बसमधील प्रवाशी बसमध्ये अडकून पडले. त्यांना बाहेरही पडता येत नव्हते. केवळ आठ प्रवाशांना आपला जीव वाचवण्यात यश आलं. तर इतर 25 प्रवाशांचा बसमध्येच होरपळून मृत्यू झाला. काल मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.