नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करा, काँग्रेसचे नेते Ashish Deshmukh यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: Mar 30, 2022 | 1:44 PM

नाणार रिफायनरी प्रकल्प गुजरातला जाईल, अशी भीती दाखविली जात होती. पण, गुजरातला प्रकल्प देण्याची गरज नाही. हा प्रकल्प विदर्भामध्ये इथल्या जनतेशी बोलून आपण करू शकतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात हा प्रकल्प आपण नेऊ शकतो, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करा, काँग्रेसचे नेते Ashish Deshmukh यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
काँग्रेसचे नेते आशिष देशमुख.
Image Credit source: tv 9
Follow us on

नवी दिल्ली : नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करा, अशी मागणी काँग्रेस विदर्भवादी नेते आशिष देशमुख (Congress Vidarbha leader Ashish Deshmukh) यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत समिती स्थापन करावी. गोसेखुर्द प्रकल्पाजवळ रिफायनरी प्रकल्प होऊ शकतो, असं आशिष देशमुख यांचं म्हणणंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनीही विदर्भात प्रकल्प उभा करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळं गोसेखुर्दला (Gosekhurd) नाणार रिफायनरी प्रकल्प होण्यास काही अडचण नाही, असं देशमुख म्हणाले. यासाठी आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विदर्भात नाणार रिफायनरीचा प्रकल्प कसा होऊ शकतो, याचा अभ्यासपूर्ण अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला.

विदर्भातील जनतेशी बोलून ठरवू – मुख्यमंत्री

नाणार रिफायनरीचा रिपोर्ट तयार करून आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. या प्रकल्पासाठी समुद्राची आवश्यकता असते हा गैरसमज आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. आपल्या देशात सहा ते सात ठिकाणी समुद्राच्या व्यतिरिक्त अशा रिफायनरी लागलेल्या आहेत. नाणारनी नाही म्हटलं तर हा प्रकल्प गुजरातला जाईल, अशी भीती दाखविली जात होती. पण, गुजरातला प्रकल्प देण्याची गरज नाही. हा प्रकल्प विदर्भामध्ये इथल्या जनतेशी बोलून आपण करू शकतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात हा प्रकल्प आपण नेऊ शकतो, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

राज्यात कुठेही प्रकल्प झाला तरी चालेल

संजय राऊत म्हणाले, आशिष देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारनं नाणार प्रकल्प विदर्भात होऊ शकेल काय, याबाबत तज्ज्ञ समितीची निवड करावी. हा प्रकल्प विदर्भात न्यावा, अशी त्यांची मागणी आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात कुठेही होवो. फक्त लोकांचा त्याठिकाणी विरोध नसावा. त्यामुळं हा प्रकल्प विदर्भात गेला तर आमचा राजकीय विरोध असण्याचा प्रश्नच नाही. हा प्रकल्प आपल्या राज्यात झाला पाहिजे, हे महत्त्वाचं असंही संजय राऊत म्हणाले.