“या सभेतून महाराष्ट्रात नाही, तर देशाच्या परिवर्तनाची सुरुवात” ; आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटाने शड्डू ठोकला

| Updated on: Apr 15, 2023 | 10:41 PM

नागपुरात महाविकास आघाडीची मोठी सभा होत असल्याने अमित शहा हे सभेवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई दौऱ्यावर येत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

या सभेतून महाराष्ट्रात नाही, तर देशाच्या परिवर्तनाची सुरुवात ; आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटाने शड्डू  ठोकला
Follow us on

नागपूर : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीमधील सभा आणि दौऱ्यांमुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. यावरून आता खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रत्नागिरी, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर आणि आता नागपूरमधील महाविकास आघाडीच्या सभेमुळे आता आणखी राजकारणात रंगत चढू लागली आहे. नागपूरमधील महाविकास आघाडीच्या सभेवरून आता खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे की, या सभेमुळे राज्यातील राजकीय वारे बदलणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच या महविकास आघाडीच्या सभेला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोबत असणार आहेत. त्यामुळे विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक भागातील कार्यकर्ते या सभेसाठी येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जरी तयारी सुरू असली तरी शिवसेना पूर्णपणे सहभागी असून ही महाविकास आघाडीची सभा आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

खासदार संजय राऊत यांनी या सभेविषयी बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांमुळे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे संपूर्ण विदर्भात आणि नागपुरात या सभेचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे फक्त विदर्भाचेच नाह तर संपूर्ण महाराष्ट्राचेच लक्ष या सभेकडे लागलेले आहे.

ही सभा भव्य व्यासपीठावरून भव्य अशी सभा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या सभेचं वातावरण संपूर्ण विदर्भात पसरले असल्याने जणू शिवाजी पार्कवरच ही सभा होत असल्याचा भास संजय राऊत यांनी म्हटले आहे.

खासदार संजय राऊत यांना या सभेविषयी प्रचंड आत्मविश्वासाने सांगितले आहे की, नागपुरातून होणाऱ्या या सभेतून परिवर्तनाची सुरुवात होणार आहे.

त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या परिवर्तनाची सुरुवात या सभेनंतर होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या या सभेकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले असतानाच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज मुंबई दौरा होता.

त्यामुळे संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात.

नागपुरात महाविकास आघाडीची मोठी सभा होत असल्याने अमित शहा हे सभेवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई दौऱ्यावर येत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच अमित शाह ही सभा एन्जॉय करण्यासाठी आले असतील व मुंबईतून ही सभा पाहावी असा त्यांचा उद्देश असेल असंही संजय राऊत यांनी मिश्कीलपणे सांगितले.