फिरायला गेलेल्या दोन युवकांना बोट दिसली; तलावात जलविहार करायला गेले ते शेवटचेच

बोट चालवण्याचा त्यांना अनुभव नव्हता. तरीही ती बोट तलावात नेण्याचे अतिधाडस त्यांनी केले. पुढे गेल्यानंतर लाकडी बोटेत पाणी शिरले.

फिरायला गेलेल्या दोन युवकांना बोट दिसली; तलावात जलविहार करायला गेले ते शेवटचेच
| Edited By: | Updated on: Mar 31, 2023 | 11:19 AM

नागपूर : भवानी आणि पंकज हे दोन्ही चुलतभाऊ समवयस्क होते. त्यामुळे ते एकमेकांचे चांगले मित्र होते. दुचाकीने ते पारशिवणी तालुक्यातील छोटा गोवा परिसरात फिरायला गेले होते. तलावाच्या काठावर त्यांना लाकडी बोट दिसली. बोट चालवण्याचा मोह त्यांना अनावर झाला. बोट चालवण्याचा त्यांना अनुभव नव्हता. तरीही ती बोट तलावात नेण्याचे अतिधाडस त्यांनी केले. पुढे गेल्यानंतर लाकडी बोटेत पाणी शिरले. बोटेत पाणी शिरत असल्याने ते घाबरले. त्यांनी आरडाओरड केली. पण, कुणापर्यंतही त्यांचा आवाज पोहचला नाही.

तलावाशेजारी सापडले कपडे, मोबाईल

सायंकाळी पाचच्या सुमारास मासेमारी करणारे तलावाची पाहणी करण्यासाठी आले. तलावाच्या काठावर त्यांना दोघांचे कपडे, बूट आणि मोबाईल दिसले. पाण्यात पाहिले असता एकाचे डोके तरंगताना दिसले. कोणीतही बुडाल्याचा त्यांना संशय आला. घटनेची माहिती त्यांनी पारशिवणी पोलिसांना दिली.

 

दोघांचेही मृतदेह बाहेर काढले

पारशिवणी पोलीस घटनास्थळी पोहचले. शोधाशोध सुरू झाली. दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. पंचनामा करून दोघांच्याही कुटुंबीयांना कळवण्यात आले. दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेची माहिती जांगीड कुटुंबीयांना देण्यात आली.

रामनवमीच्या पर्वावर दुःखाचा डोंगर

कुटुंबातील दोघांच्या मृत्यूची बातमी रामनवमीच्या पर्वावर एकताच त्यांच्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पारशिवणी पोलिसांनी घटनेची नोंद केली. पोलीस निरीक्षक राहुल सोनवने तपास करत आहेत. जिल्ह्यातील पारशिवनी परिसरात नाव उलटून दोन तरुणाचा मृत्यू झाला. नागपूरवरुन फिरायला गेले असता नाव पलटल्याने झाला मृत्यू झाला. अर्धवट तुटलेली लाकडी नाव उलटली आणि दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला.

परिसरात शोककळा पसरली

गुरुवारी दुपारी पारशिवनी येथील बरेजा पंच कमिटीच्या तलावात ही घटना घडली. मृतकांमध्ये भवानी जांगीड (वय 24) आणि पंकज जांगीड (वय 23) यांचा समावेश आहे. दोघही नागपुरातील महेश कॉलनीतील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूची बातमी घरी येताच परिसरात शोककळा पसरली. दोन्ही तरुण उच्चशिक्षित होते. पण, त्यांनी केलेलं धाडस त्यांच्या जीवावर बेतले. पाणी आणि आग यांच्या वाट्याला जाऊ नये, असं म्हणतात. ते या तरुणांच्या लक्षातच आले नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली.