अजून राजीनामा आलेला नाही, बाळासाहेब तुमच्याशी बोलत असतील तर…माध्यमांना सवाल करत नाना पटोले काय बोलून गेले ?

| Updated on: Feb 07, 2023 | 12:12 PM

बाळासाहेब थोरात हे आजारी असल्याने त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही असे म्हणत राजीनाम्यावर भाष्य करणं टाळलं पण पटोले यांच्या बोलण्यातून थोरात विरुद्ध पटोले हा वाद विकोपाला गेल्याचे समोर आले आहे.

अजून राजीनामा आलेला नाही, बाळासाहेब तुमच्याशी बोलत असतील तर...माध्यमांना सवाल करत नाना पटोले काय बोलून गेले ?
Image Credit source: Google
Follow us on

गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपुर : गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील कॉंग्रेसमध्ये वाद ( Congress ) असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. विधानपरिषद निवडणूक काळात कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. आणि त्यानंतर आता पुण्यातील पोटनिवडणूकीच्या दरम्यान हा वाद थेट विकोपालाच गेला असल्याचं समोर आलं आहे. थेट कॉंग्रेसच्या अध्यक्षांपर्यन्त हा वाद जाऊन पोहचल्याचे समोर आले आहे. कॉंग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. नाना पटोले यांच्या विरोधात बोललं जाऊ लागले असून विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat resignation) यांनी थेट पक्षेनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी बोलतांना माध्यमांनाच सवाल करत बोलणं टाळलं आहे.

काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेच्या काळात जे राजकारण त्यावरून नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसच्या हायकमांडला पाठविल्याचे म्हंटले होते.

त्यानंतर बाळासाहेब थोरात यांचे कॉंग्रेस पक्षाचे विधिमंडळ पद धोक्यात येईल अशी चर्चा असतांनाच बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

त्यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुरुवातीला बोलणं टाळत माध्यमांच्या प्रश्नाला बगल दिली होती. मात्र, त्यानंतर माध्यमांनी पुनः प्रश्न विचारात नाना पटोले काही अंशी संतापले होते, माझ्याकडे अजून राजीनामा आलेला नाही, माझ्याशी ते बोलत नाही तुमच्याशी बोलत असतील तर सांगा असं बोलून गेले.

आपण काय बोललो हे लक्षात येताच नाना पटोले यांनी बोलणं सावरलं, आणि बाळासाहेब थोरात हे आजारी असल्याने त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही असे म्हणत राजीनाम्यावर भाष्य करणं टाळलं पण पटोले यांच्या बोलण्यातून थोरात विरुद्ध पटोले हा वाद विकोपाला गेल्याचे समोर आले आहे.

सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन कॉंग्रेसमधील अनेक नेते कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बाळासाहेब थोरात यांनी पटोले यांच्या विरोधात जाऊन भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

कॉंग्रेसकडून सत्यजित तांबे यांना उमेदवारी न मिळाल्याने बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस हायकमांडकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लागलीच राजीनामा दिल्याची माहिती समोर आहे,त्यामुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे हे स्पष्ट झाले आहे.

त्याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी कॉंग्रेस पक्षाची जास्त काळजी माध्यमांना असल्याचे म्हणत बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर बोलणं टाळतांना माध्यमांना लक्ष करत असतांना काही अंशी संतापल्याचे चित्र होते.