नंदूरबारमध्ये ‘ऑपरेशन किलिंग’; दिवसभरात 88 हजार कोंबड्या मारल्या

| Updated on: Feb 08, 2021 | 11:40 PM

नंदुरबारमधील 5 पोल्ट्री फार्मवर हे किलिंग ऑपरेशन राबवण्यात आले. (Nandurbar Operation Killing After Bird flu In Maharashtra)

नंदूरबारमध्ये ऑपरेशन किलिंग; दिवसभरात 88 हजार कोंबड्या मारल्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नंदुरबार : राज्यात बर्ड फ्लूचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. आज नंदुरबारमध्ये दिवसभरात 88 हजार कोंबड्या मारण्यात आल्या आहेत. नंदुरबारमधील 5 पोल्ट्री फार्मवर हे किलिंग ऑपरेशन राबवण्यात आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. यातील काही पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यात बर्ड फ्लूने डोकंवर काढल्याचं बोललं जात आहे. (Nandurbar Operation Killing After Bird flu In Maharashtra)

याच पार्श्वभूमीवर नंदुरबारमधील 5 पोल्ट्री फॉर्मवर किलिंग ऑपरेशन राबवण्यात आले. नंदुरबारमध्ये आज दिवसभरात 88 हजार 373 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. जवळपास 82 पथकांनी हे किलिंग ऑपरेशन केलं आहे. यातील 450 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसात 1 लाख 30 हजार 747 पक्ष्यांचे किलिंग करण्यात आले.

एक लाख कोंबड्या मारल्या

राज्यात काही कोंबड्या आणि बदकांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे आढळून आल्याने या पक्ष्यांचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला तो परिसर “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषीत करण्यात आलं आहे. या परिसरांमध्ये प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. बर्ड फ्लूमुळे कोंबड्या दगावलेल्या पोल्ट्री फार्मपासून 1 किमी अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून 1,09,426 कुक्कुट पक्षी (यात नवापूर जि. नंदुरबार येथील 31,400पक्षी समाविष्ट), 44, 686 अंडी व 63,864 किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहेत. या पक्ष्यांच्या मालकांना आजतागायत 34.06 लाख रुपये अनुदान म्हणून वाटप करण्यात आले आहे.

बर्ड फ्लू रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बळ

बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने, प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 अधिनियामान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचना 12 जानेवारी 2021 नुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. बर्ड फ्लूमुळे पक्षी दगावलेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून, आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून त्वरित करण्यात येत आहेत.

पक्षी पाळणाऱ्यांनो नियम पाळा

कुक्कुट पालन करणाऱ्यांनी किंवा कुक्कुट पक्षी पाळणाऱ्यांनी जैव सुरक्षा उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. (Nandurbar Operation Killing After Bird flu In Maharashtra)

संबंधित बातम्या : 

राज्यात दिवसभरात 6 हजार कोंबड्या दगावल्या, बगळे, पोपट, चिमण्यांचाही मृत्यू, बर्ड फ्लूचा धोका वाढला?