Nashik | दिक्काल धुक्याच्या वेळी, प्राणांवर नभ धरणारे; कोविड अनाथांवर प्रशासनाच्या मायेची पाखर!

कोरोनाने डोळ्यांत प्राण घेऊन घरी आपली वाट पाहणारी आई हिरावून नेली. रात्री तितक्याच मायेने अंगावर हात टाकून झोपणारे बाबा नेले. मग जगायचे तरी कसे, असा प्रश्न नाशिक जिल्ह्यातील 38 मुलांसमोर होता. मात्र, प्रशासनाने त्यांना आधार देत हा प्रश्न सोडवला आहे.

Nashik | दिक्काल धुक्याच्या वेळी, प्राणांवर नभ धरणारे; कोविड अनाथांवर प्रशासनाच्या मायेची पाखर!
Photo source: Google
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Jan 15, 2022 | 9:32 AM

नाशिकः सगळे जग अंधारून आले, आपले सगे सोयरे सोडून गेले इतकेच काय आपल्यावर प्राणांतिक माया करणाऱ्या आई-वडिलांनीही जगाचा निरोप घेतला, तर सैरावैरा धावायला हे जगही अपुरे पडते. अशा वेळी कवी ग्रेसांच्या या ओळी आठवतात….

नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे

नाशिकमध्ये कोरोनामुळे (Corona) अनाथ झालेल्या मुलांची परिस्थिती नेमकी अशीच झालेलीय. मात्र, सगळे जग संपत आलेले असताना, या दिक्काल धुक्याच्यावेळी त्यांच्या प्राणांवर नभ धरण्यासाठी कोणीतरी पुढे आले आहे. त्यांनी या अनाथांना आधार देत त्यांचे जगणे सावरले आहे. ते म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून जिल्हा प्रशासन आहे. त्यांनी अनाथांना वात्सल योजनेचा लाभ देणे सुरू ठेवले आहेच. सोबतच इतर 45 योजनांही त्यांच्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि प्रशासनाने केले आहे.

संपत्तीला वारस म्हणून 38 मुले

कोरोनाने डोळ्यांत प्राण घेऊन घरी आपली वाट पाहणारी आई हिरावून नेली. रात्री तितक्याच मायेने अंगावर हात टाकून झोपणारे बाबा नेले. मग जगायचे तरी कसे, असा प्रश्न जिल्ह्यातील 38 मुलांसमोर होता. शिवाय त्यांच्या आई-वडिलांच्या संपत्तीवरही इतर नातेवाईकांचा डोळा होता. हे पाहता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत या मुलांची नावे त्यांच्या आई-वडिलांच्या संपत्तीला वारस म्हणून लावली. शिवाय त्यांचे शिक्षण आणि इतर सोयीसाठीही पुढाकार घेण्यात आलाय, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

संबंधितांच्या नावे मुदत ठेव

कोरोनाने अनेक कुटुंब नाशिकमध्ये देशोधडीला लागली. काही कुटुंबामध्ये आई-वडील गेल्याने मुले पोरकी झाली. त्यांचा सांभाळ करायला नातेवाईकांनीही नकार दिला. यांच्या मदतीलाही जिल्हा प्रशासन पुढे आले आहे. अशा मुलांच्या नावावर ठराविक रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा पुढील खर्च आणि जीवनही खऱ्या अर्थाने सुकर झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय अनेक महिला कोरोनामुळे विधवा झाल्या. त्यांनाही इतर योजनांमध्ये सहभागी करून घ्यायचा विचार आहे.

नाशिकमध्ये विशेष भर टाकलेल्या बाबी

1. सर्व योजनांचे एकत्रित संकलन करून त्या योजनांचे कार्ड तयार करण्यात येणार आहे.

2. कार्डवर योजना कोणत्या विभागाशी संबंधित, योजनेचा लाभ कोणते, हे टाकले जाणार.

3. कार्डवर योजनेचा आदेश कोणत्या क्रमांकाने दिला याची सोय करण्यात येणार आहे.

3. अनाथ बालके अन्यत्र रहिवासी गेली तरी त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमधील हक्काचे संरक्षण.

4. अनाथ बालकांची नावे आई-वडिलाांच्या संपत्तीवर लावत अज्ञान पालनकर्ता म्हणून नोंद.

4. संबंधित तहसीलदार हे या कामासाठी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील.

इतर बातम्याः

Devyani Farande| 2 टर्म आमदारकी, महापालिकेतही छाप; परखड नेतृत्व देवयानी फरांदेंच्या वाटचालीवर वाढदिवसानिमित्त नजर …

Nashik Corona|नाशिकमध्ये आदिवासी महिलांचे लसीकरण कौतुकास्पद, राज्यभर अंमलबजावणी व्हावी, उपसभापतींची थाप…!

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us