कर्ज थकबाकी वसूलीसाठी जिल्हा बँकेचा नवा फंडा, संपूर्ण जिल्ह्यातील बड्या थकबाकीदारांच्या मनात भरली धडकी

| Updated on: May 08, 2023 | 11:04 AM

नाशिक जिल्हा बँकेच्या वतीने पुन्हा एकदा कर्ज वसूली मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये आता 67 बड्या थकबाकीदार यांना जिल्हा बँकेने रडारवर घेतले आहे.

कर्ज थकबाकी वसूलीसाठी जिल्हा बँकेचा नवा फंडा, संपूर्ण जिल्ह्यातील बड्या थकबाकीदारांच्या मनात भरली धडकी
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : कधीकाळी जिल्ह्याची अर्थ वाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा बँकेला थकबाकीदारांनी कर्ज परतफेड न केल्याने अखेरच्या घटका मोजावे लागत आहेत. आरबीआयचा परवाना अबाधित ठेवण्यासाठी नाशिक जिल्हा बँकेला कठोर पाऊले उचलावे लागत आहे. त्याच दरम्यान मोठ्या प्रमाणात कर्ज परतफेड न झाल्याने बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामध्ये बड्या 67 थकबाकीदारांनी बँकेचं कर्ज न फेडल्यानं कोट्यवधी रुपये अडकून पडले आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे बँकेने कर्ज वसूल करण्यासाठी 67 बड्या थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये जाहीर यादी प्रसिद्ध करून हवा तसा प्रतिसाद जिल्हा बँकेला मिळाला नाही. खरंतर जिल्हा बँकेचे 55 हजाराहून अधिक थकबाकीदार आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेने आता नवी शक्कल लढवली आहे.

नाशिक जिल्हा बँकेच्या वतीने गावागावात आता थकबाकीदारांच्या यादीचा फलक लावला जाणार आहे. याशिवाय दवंडी देखील दिली जाणार आहे. त्यामुळे एकप्रकारे जिल्हा बँकेने थकबाकीदार आहे त्यांनी कर्जपरतफेड करावी यासाठीचा हा खटाटोप आहे. त्यामध्ये आता ही नवी शक्कल कितपत प्रभावी ठरते यावर भर दिला जात आहे.

खरंतर बड्या थकबाकीदारांमध्ये अनेक नेते आहेत. प्रभावशाली व्यक्ती असल्याने त्यांच्याकडील थकबाकी वसूल कशी करायची यासाठी अनेक अधिकारी धजावत नव्हते. त्याच दरम्यान आता गावागावात थकबाकीची यादी प्रसिद्ध होणार असल्याने बदनामीच्या भीतीपोटी थकबाकी भरू शकतात अशी अपेक्षा बँकेला आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी जिल्हा बँकेच्या वतीने थकबाकीदार शेतकऱ्यांची वसूली बँकेकडून केली जात होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर ही वसूली मोहीम थांबविण्यात आली होती. पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर शेतकरी संघटणेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.

ठिकठिकाणी रास्तारोको करण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी आंदोलने केली होती. त्यानंतर सहकार मंत्र्यांनी यामध्ये वसूलीला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याच्या सूचनाही बँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. अशातच बँकेच्या वतीने केली जाणारी वसूलीच्या कारवाई बळ मिळाले होते.

नाशिक जिल्ह्यातील अनेक बडे थकबाकीदार हे जिल्ह्यातील बडे राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांना सोडून लहान शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट शेतकऱ्यांनी घेतली होती.

त्यानंतर बॅंकेकडून ही कारवाई केली जात आहे. त्यामुळे बड्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून येत्या काळात वसूली मोहीम यशस्वी होते का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.