तडाखेबंद पावसानं नाशिकमध्ये 14 धरणे फुल्ल; वार्षिक सरासरीचा चेंडू सीमेपार!

| Updated on: Sep 30, 2021 | 11:20 AM

गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या जोरदार हजेरीमुळं नाशिकमधली 14 धरणे (Dams) काठोकाठ भरलीयत, तर (Nashik) जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा चेंडू सीमेपार गेलाय.

तडाखेबंद पावसानं नाशिकमध्ये 14 धरणे फुल्ल; वार्षिक सरासरीचा चेंडू सीमेपार!
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण भरले आहे.
Follow us on

नाशिकः गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या जोरदार हजेरीमुळं नाशिकमधली 14 धरणे (Dams) काठोकाठ भरलीयत, तर (Nashik) जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा चेंडू सीमेपार गेलाय.

नाशिक जिल्ह्यावर सुरुवातीला रुसलेल्या पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी त्यामुळं हाहाकार उडालाय. मनमाड, नांदगाव या ठिकाणी दोनदोनदा पूर आला. नाशिकमध्ये गोदामाय चारदा ओसडंली. गंगापूर धरण समूह भरलाय. गंगापूर धरणातून सतत विसर्ग सुरू होता. तूर्तास तरी पावसाच्या या तडाखेबंद बॅटींगनं जिल्ह्याची तहान भागलीय. जिल्ह्यातल्या चौदा धरणांचा पाणीसाठा शंभर टक्क्यांवर गेलाय. त्यात गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या, माणिकपुंज या धरणांचा समावेशय. तीसगाव, चणकापूर, पुनद ही धरणेही भरण्याच्या मार्गावरयत.

आतापर्यंत 15521.7 मिमी बरसला

नाशिक जिल्ह्यातल्या पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही 15004.69 मिमी आहे. त्यात बुधवारी झालेल्या नोंदीनुसार ही सरासरी आता 15521.7 मिमीवर पोहचलीय. गुलाबी चक्रीवादळानं जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं अनेक ठिकाणी घरे कोसळली. शेतीचं मोठं नुकसान झालं. सध्या पावसानं पाठ फिरवली तरी हरकत नाही. कारण उरलं-सुरलं खरीप तर पदरात पडेल, अशी आशा शेतकरी करतोय.

दिवसभरात 243 मिमीची नोंद

नांदगावला मंगळवारी दिवसभरात 243 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. येवल्यात 76 मिमी पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पाणी शिरलं. मनमाडला पांझण आणि रामगुळणा नद्यांना पूर आला. मनमाडची जीवनवाहिणी असणारे वाघदर्डी धरण भरलंय. निफाड तालुक्यातील उगाव, शिवडी, खेडे परिसरात द्राक्षबागांचं नुकसान झालंय. मालेगावमध्ये पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. तब्बल सहा गावांमधील तीन हजार हेक्टरवरील पीक उद्धवस्त झालं असून, त्याचा जवळपास 5 हजार शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल कृषी विभागानं जिल्हा प्रशासनाला दिला असून, लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

पंचनाम्याचे आदेश

गेल्या 24 तासात नाशिक जिल्ह्यात काही भागात प्रचंड पाऊस झालाय. मंगळवारी रात्रीपासून सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांशी समन्वयानं माहिती संकलनाचं काम सुरू असून, शासन-प्रशासनाला मनुष्यासह सर्व जीवितांची काळजी आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असं आवाहन राज्याचे अन्न नागरी पुरवठव व ग्राहक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. (14 dams in Nashik district filled, rainfall exceeded annual average)

इतर बातम्याः

6 कोटींची उलाढाल ठप्प; नाशिकमध्ये महापुराच्या भीतीनं सराफा बंद

अंडरवर्ल्ड डॉन धमकीप्रकरणाला नाट्यमय कलाटणी, निकाळजे म्हणतात, कांदेंवर दावा ठोकणार