शेतात पाणी द्यायला गेला, तेवढ्यात बिबट्याने चढवला हल्ला, त्यानंतर…

| Updated on: Mar 23, 2023 | 6:50 PM

एकीकडे शेत शिवारात बिबट्या असतो. दुसरीकडे महावितरणकडून पिकांना पाणी देण्यासाठी शेतात दिवसा भारनियमन केले जाते. रात्रीचा थ्री फेज वीज पुरवठा सुरू असतो.

शेतात पाणी द्यायला गेला, तेवढ्यात बिबट्याने चढवला हल्ला, त्यानंतर...
Follow us on

मालेगाव : या परिसरात नियमित बिबट्याचा दर्शन शेतकऱ्यांना घडते. या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी वेळोवेळी शेतकऱ्यांकडून मागणी होते. एकीकडे शेत शिवारात बिबट्या असतो. दुसरीकडे महावितरणकडून पिकांना पाणी देण्यासाठी शेतात दिवसा भारनियमन केले जाते. रात्रीचा थ्री फेज वीज पुरवठा सुरू असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागते. महावितरणने शेतात दिवसा थ्री फेज वीज पुरवठा देण्याची मागणी यापूर्वी शेतकऱ्यांनी वेळोवेळी केली आहे. मात्र याकडे सरासपणे दुर्लक्ष केले जाते. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुलाने केली बिबट्याच्या तावडीतून सुटका

उन्हाळा कांदा पिकाला पाणी भरत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यामुळे शेतकरी जखमी झाल्याची घटना मालेगाव तालुक्यातील कजवाडे येथे घडली. वडिलांवर बिबट्याने हल्ला केल्याचे लक्षात येताच मुलाने धाव घेतली. त्यामुळे शेतकरी भरत अहिरे (वय 45) यांची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. दरम्यान, जखमी शेतकरी अहिरे यांच्यावर मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुढीपाडव्याला बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे कजवाडेसह परिसरात खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

सकाळी साडेसहा वाजताची घटना

शेतकरी भरत अहिरे रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. बुधवार सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. याचवेळी बाजूच्या शेतात असलेल्या त्याच्या मुलाने आवाज ऐकल्याने धाव घेत बिबट्याला हुसकावून लावले.

बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

मात्र तोपर्यंत बिबट्याने अहिरे यांच्या हाताचा लचका तोडला होता. जखमी अवस्थेत अहिरे यांना मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार साठी दाखल केले. वन विभागाचे अधिकारी हिरे यांनी रुग्णालयात जाऊन शेतकरी अहिरे यांची विचारपूस केली. दरम्यान, कजवाडेचे सरपंच आणि शेतकरी यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

या बिबट्यामुळे परिसरातील नागरिक परेशान आहेत. केव्हाही हा बिबट्या दिसतो. त्यामुळे याचा बंदोबस्त करण्यात यावा,अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.