अजित पवार यांचं सत्यजीत तांबे यांच्याबद्दल मोठं विधान, आता काँग्रेसमध्ये काय घडणार?

| Updated on: Feb 02, 2023 | 7:12 PM

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या विजयाच्या अधिकृत घोषणेपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे.

अजित पवार यांचं सत्यजीत तांबे यांच्याबद्दल मोठं विधान, आता काँग्रेसमध्ये काय घडणार?
Follow us on

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Padvidhar Election) अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) हे जिंकून येण्याची दाट शक्यता आहे. कारण मतमोजणी सुरु झाल्यापासून ते आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे ते सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यापेक्षा दुप्पट मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे ते जिंकून येण्याची शक्यता जास्त आहे. विशेष म्हणजे सत्यजीत तांबे यांच्या विजयाच्या अधिकृत घोषणेआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे हेच जिंकून येतील आणि ते जिंकून आल्यावर योग्य निर्णय घेतील, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे नाशिकच्या राजकारणात पुढच्या काही दिवासांमध्ये आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे, असा अंदाज बांधला जातोय.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. पण त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. याउलट त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

दुसरीकडे भाजपने उमेदवार उभा केला नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पण त्यांना पक्षाने पाठिंबा दिला नाही. त्यामुळे ही भाजपचीच खेळी असल्याचं मानलं जात होतं.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे सत्यजीत तांबे यांनीदेखील याबाबत कमालीची गुप्तता बाळगली. सत्यजीत तांबे यांनी भाजपबद्दलच्या चर्चांवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आणखी चर्चांना उधाण आलं. या सगळ्या घडामोडी पाहता काँग्रेसच्या हायकमांडने तांबे पिता-पुत्रावर निलंबनाची कारवाई केली.

पक्षाकडून निलंबनाची कारवाई झाल्यानंतरही सत्यजीत तांबे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली नाही. याउलट आपण योग्य वेळेवर प्रतिक्रिया देऊ, असंच तांबे म्हणत राहिले.

सत्यजीत तांबे यांची नेमकी काय भूमिका आहे? ते अद्यापही समजू शकलेलं नाही. विशेष म्हणजे आज निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय. तांबे या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यापेक्षा दुप्पट मतांनी आघाडीवर आहेत.

या सगळ्या राजकीय घडामोडींदरम्यान अजित पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. एकीकडे सत्यजीत तांबे आणि भाजप यांच्यात जवळीक वाढल्याची चर्चा होतेय. तर दुसरीकडे अजित पवारांनी तांबे कुटुंब काँग्रेस पक्षाशी कित्येक वर्षांपासून बांधिल असल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“खरंतर माझ्या सारख्याने काँग्रेस या राष्ट्रीय पक्षावर बोलणं उचित ठरणार नाही. पण एकेकाळी सत्यजीत तांबे हे काँग्रेस पक्षाचे युवकांचे अध्यक्ष म्हणून बराच काळ काम करत होते. पक्षाशी बांधिलकी असलेला नवा चेहरा म्हणून सत्यजीत तांबे यांची ओळख आहे. त्यांना पक्षाने उमेदवारी दिली असती तर असं काही घडलंच नसतं”, असा दावा अजित पवारांनी केला.

“शेवटी नाईलाजे त्यांना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरावा लागला. नंतरच्या काळात काही वेगळे निर्णय त्याठिकाणी घेण्यात आले. पण ते संपूर्ण घराणच, त्यांचे वडील, आजोबा हे काँग्रेसच्या विचारांचे आहेत. सत्यजीत तांबे हे आघाडीवर आहेत आणि तेच निवडून येतील. ते निवडून आल्यावर योग्य तोच निर्णय घेतील”, असं अजित पवार म्हणाले.