मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना?… छे… छे… कदापि नाही, त्रिवार नाही; उद्धव ठाकरे यांनी फटकारले

Uddhav Thackeray | अयोध्येत रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यात गोविंदगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मोदींची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना होऊ शकत नाही. कदापि नाही, त्रिवार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना?... छे... छे... कदापि नाही, त्रिवार नाही; उद्धव ठाकरे यांनी फटकारले
| Updated on: Jan 23, 2024 | 1:24 PM

नाशिक | 23 January 2024 : श्रीराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील अधिवेशनात चांगलाच समाचार घेतला. 22 जानेवारी रोजी गोविंदगिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केली होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. काल कोणीतरी म्हणाले छत्रपती म्हणजे आपले पंतप्रधान..पण पंतप्रधानांची आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांशी कधीच तुलना होऊ शकत नाही, छत्रपती होते म्हणून आज राम मंदिर उभे झाले, असे कानही त्यांनी टोचले.

रामाचे मुखवटे घालून रावण फिरतायेत

‘आज रामायणातील बारकावे संजय राऊत यांनी सांगितले. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले होते. राऊतांनी सामनाचे श्लोक सांगितले. सामना कसा करावा याचे श्लोक सांगितले. संयम , एक वचनी आणि एक पत्नी ते खरच आहे. माझा उल्लेख केला. ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आज रामाचे मुखवटे घालून रावण फिरत आहेत. त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत.’ असा इशारा पण त्यांनी दिला.

काल सर्व अंधभक्त जमले

काल सर्व अंधभक्त तिकडे जमले होते. त्यांचं ज्ञान आणि बुद्धीचा आदर करतो. कुणी तरी एकाने मोदींची बरोबरी पंतप्रधानांची तुलना शिवाजी महाराजांशी केली. आजचे शिवाजी म्हणजे पंतप्रधान. अजिबात नाही. त्रिवार नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहूच शकलं नसतं. तुम्ही तिकडे बसला ते केवळ शिवाजी महाराजांमुळेच नाही तर ते ऐऱ्या गबाळ्याचं काम नव्हतं. ती माती आहे, त्यात ते तेज जन्माला आलंय, असा समाचार त्यांनी घेतला.

दहा वर्षांत काय केले

प्रभू रामचंद्राचा एक तरी गुण तुमच्यात आहे हे तरी कळू द्या. एक तरी गुण. प्रभू रामचंद्र एकवचनी होते. सत्य वचनी होते. ज्या शिवसेनेने तुम्हाला ज्या गादीपर्यंत पोहोचवलं, त्या शिवसेनेला दिलेलं वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे होऊ शकता. आपल्यालाही वालीचा वध करावा लागेल. कारण त्यांनी शिवसेना पळवली. भगव्याशी प्रतारणा केली. त्यांचा कोणीही वाली असेल त्यांचा राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही. असा निर्धार करण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. दहा वर्षांत काय केले असा सवाल त्यांनी मोदी सरकारला केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us