राज्यात जे काही सुरुये ते अनाकलनीय…; शिंदे सरकारमधील भाजपच्या वरिष्ठ मंत्र्याचं विधान

| Updated on: Feb 10, 2024 | 10:11 AM

Chandrakant Patil on Maharashtra Law and order Situation : राज्यात घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं महत्वाचं विधान केलंय. राज्यात सध्या चाललंय ते अनाकलनीय आहे, असं ते म्हणालेत.

राज्यात जे काही सुरुये ते अनाकलनीय...; शिंदे सरकारमधील भाजपच्या वरिष्ठ मंत्र्याचं विधान
Follow us on

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नाशिक | 10 फेब्रुवारी 2024 : गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. आधी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर मुंबईच्या उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. त्यानंतर मॉरिस नरोन्हाने ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करत हत्या केली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यापाठोपाठच चाळीसगाव गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महिंद्र मोरे यांचा मृत्यू झाला. या सगळ्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर भाजपचे वरिष्ठ नेते, आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे.

घडणाऱ्या घटना चिंताजनक- चंद्रकांत पाटील

राज्यात सुरु असलेल्या गोळीबाराच्या सत्रावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात घडणाऱ्या घडणाऱ्या घटना चिंताजनक आहेत. त्याची योग्य स्तरावर चौकशी आणि कारवाई होते आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चाळीसगाव गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महिंद्र मोरे यांचा मृत्यू झाला. यावर बोलताना अपुऱ्या माहितीवर बोलणं योग्य नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.  ते नाशिकमध्ये बोलत होते.

भुजबळांना जीवे मारण्याची धमकी, पाटील चंद्रकांत म्हणाले…

छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती दिली आहे. यानंतर भुजबळांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यावरही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात सध्या चाललंय ते अनाकलनीय आहे. कुठे तरी शांतपणे सर्व पक्षांनी त्याचा विचार करणे आवश्यक आहे. छगन भुजबळ यांना आलेल्या धमकीची दखल घेण्याकरिता सरकार सक्षम आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

वागळेंच्या गाडीवर हल्ला, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

वरिष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर काल रात्री पुण्यात हल्ला करण्यात आला. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. देशाच्या उच्च स्थानावर ( राष्ट्रपती, पंतप्रधान ) बसलेल्या व्यक्तींना लोकशाहीमध्ये काहीही बोलण्याचा अधिकार असला, तरी त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या माणसांमध्ये संताप, प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. तो संताप लक्षात घेवून त्यांनी नीट बोलावं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.