नाशिक मार्गावरचा शिंदे टोलनाका होणार बंद; तीन महिन्यांत दिलासा मिळण्याची शक्यता

पुणे-नाशिक महामर्गावर शिंदे गावाजवळील टोलनाका आणि संगमनेरच्या टोलनाक्यात फक्त 52 किलोमीटरचे अंतर आहे, तर पुणे-सोलापूरच्या दरम्यान 60 किलोमीटरच्या आत सावळेश्वर आणि वरवडे हे दोन टोलनाके आहेत. यातील वरवडेचा टोलनाका बंद होणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच शिंदेचा टोलनाका बंद करावा, असा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्गाने पाठवला आहे.

नाशिक मार्गावरचा शिंदे टोलनाका होणार बंद; तीन महिन्यांत दिलासा मिळण्याची शक्यता
नाशिक मार्गावरील शिंदे टोलनाका लवकरच बंद होणार आहे.
| Updated on: Mar 24, 2022 | 10:35 AM

नाशिकः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या घोषणेनंतर आता पुणे-नाशिक (Nashik) महामार्गावरील शिंदे टोलनाका (Toll plaza) आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोलनाका बंद होणार आहे. पुणे-नाशिक महामर्गावर शिंदे गावाजवळील टोलनाका आणि संगमनेरच्या टोलनाक्यात फक्त 52 किलोमीटरचे अंतर आहे, तर पुणे-सोलापूरच्या दरम्यान 60 किलोमीटरच्या आत सावळेश्वर आणि वरवडे हे दोन टोलनाके आहेत. यातील वरवडेचा टोलनाका बंद होणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच शिंदेचा टोलनाका बंद करावा, असा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्गाने पाठवला आहे. आता गडकरींच्या घोषणेनंतर त्याची येत्या तीन महिन्यांत अंमलबजावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरे तर कमी अंतरावर दोन-दोन टोलनाके असल्याने नागरिकांच्या खिशाला भुर्दंड पडत होता. यावरून अनेकदा वादही निर्माण होत. टोलभरण्यावरून कित्येकदा मारामारीपर्यंतही येथील अनेक प्रकरण गेली आहेत. दरम्यान, शिंदे टोलनाका बंद करा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनीही केली आहे.

स्थानिकांना मिळणार पास

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता महामार्गावरुन प्रवास करत असताना सरकारकडून एका ठराविक मर्यादेपर्यंतच टोल वसूल केला जाणार असल्याची घोषणा केलीय. महामार्गावर टोलनाक्यांची संख्या मर्यादित असणार आहे, म्हणजेच 60 किलोमीटरच्या आत दुसरा टोल नाका नसावा असा नियम करण्यात येणार आहे. तसेच महामार्गाजवळ राहणाऱ्या स्थानिकांनाही दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्यांना पास देण्यात येणार आहे. या पासमुळे त्यांच्याकडून टोल वसूल केला जाणार नाही. केंद्र सरकारची ही योजना तीन महिन्यांत लागू करण्यात येणार आहे.

जितका रस्ता तितकाच टोल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी जितका रस्ता वापरला तितकाच टोल वसूल केला जाईल, अशी घोषणा केलीय. त्याचीही लवकरच अंमलबजावणी होणार असल्याचे समजते. जर टोलनाके बंद केले, तर रस्ते बनवणाऱ्या कंपन्या सरकारडे भरपाई मागतील. त्यामुळे सरकारने सर्व टोलनाके हटवण्याची योजना केली आहे. सध्या सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, जिथे तुम्ही हायवेवर प्रवेश करताच, जीपीएसच्या मदतीने तुमचा फोटो काढला जाईल. जिथून तुम्ही हायवे सोडाल, तिथेही फोटो घेतला जाईल. म्हणजे तुम्ही जेव्हढा हायवेचा प्रवास केला किंवा जेव्हढा रस्ता वापरला तेव्हढाच टोल तुम्हाला द्यावा लागणार आहे.

इतर बातम्याः

नाशिकच्या म्हाडा घोटाळ्यात जाधव बळीचा बकरा; एकूण 9 महापालिका आयुक्त अन् म्हाडाच्या अधिकाऱ्यांना अभय

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?