लचकंतोड्या पावसाने झोडपले, ढगफुटीसारखी हजेरी; नाशिक जिल्ह्यात द्राक्षबागांसह पिकांचे क्षणात होत्याचे नव्हते!

| Updated on: Oct 10, 2021 | 12:00 PM

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भयाण पावसाने शेतकऱ्यांना अक्षरशः हादरून सोडले आहे. ढगफुटीसारख्या झालेल्या जोरधारांनी शेतीची दाणादाण उडवली असून, पिकांवर केव्हाच नांगर फिरला आहे.

लचकंतोड्या पावसाने झोडपले, ढगफुटीसारखी हजेरी; नाशिक जिल्ह्यात द्राक्षबागांसह पिकांचे क्षणात होत्याचे नव्हते!
नाशिक जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे.
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भयाण पावसाने शेतकऱ्यांना अक्षरशः हादरवून सोडले आहे. ढगफुटीसारख्या झालेल्या जोरधारांनी शेतीची दाणादाण उडवली असून, पिकांवर केव्हाच नांगर फिरला आहे.

जिल्ह्यात शनिवारी दुपारी आणि रात्री अनेक भागात अंगावर काटा आणण्याऱ्या पावसाने धुमाकूळ घातला. दिंडोरी तालुक्यातल्या वरखेडा, मातेरेवाडी, बोपेगाव, पालखेड खडक, सुकेणे परिसरात अक्षरशः ढगफुटी झाली. सिन्नर तालुक्यातल्या दोडी, शिवाजीनगर, खंबाळे, सुरेगाव, कणकोरी, मानोरी, गोंदे, दापूर परिसरात झालेल्या पावसाने सोयाबीन पाण्यात गेले आहे. येवला आणि नांदगाव तालुक्यातही दमदार पाऊस झाला. मुखेड, नेभगाव, भिंगारे या गावांना पावसाने झोडपले. त्यामुळे द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले. टोमॅटो, मिरची, मका, सोयाबीनची माती झाली. पेठ तालुक्यातील पाटे येथे वीज कोसळून गोठ्यात बांधलेला रेडा जागीच ठार झाला. चांदवड तालुक्यात झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाने ओझरखेड कालवा फुटला. कालव्याचे पाणी रेल्वे भुयारी मार्गात तुंबले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला.

सरसकट पंचनाम्याची मागणी

येवला तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मका पीक घेतले. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले. मका पिकात गुडघ्या इतके पाणी साचले. पीकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्यामुळे याची तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. येवल्यातल्या विजय जेजुरकर यांनी मका लागवड केली होती, तर रामनाथ देशमुख यांनी तीन एकरवर कांद्याची लागवड केली होती. त्याला जवळपास 60 ते 70 हजार रुपये खर्च आला. मात्र, अतिवृष्टीमुळे कांद्याच्या वाफ्यांमध्ये पाणी साचले. पीक पूर्णपणे खराब झाले असून शासनाने सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

भयंकर नुकसान

जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात नाशिककडे पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये विनाशक हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 54 हजार 877 हेक्टरवरील पीक मातीमोल झाले आहे. पावसामुळे झालेला हाहाकार पाहून कुणाचेही काळीज पिळवटून निघेल इतके नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पीके तर आडवी झालीच आहेत, सोबतच 7 हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या असून, १०४ घरांची पडझड झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक पंचनाम्यात उघड झाले आहे. या विनाशकारी पावसाचा तब्बल 152 गावांमधील 69 हजार 269 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पावसाने फळबागा, मका, बाजरी, कापूर, सोयाबीन, भुईमुगाचे अतोनात नुकसान झाले आहे.

इतर बातम्याः

नाशिकमध्ये पहिल्यांदाच UPSC परीक्षा; आज 3445 विद्यार्थी भविष्य आजमावणार

देवदर्शनावरून परतणाऱ्या महिलेचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू; नाशिकमधल्या घटनेने हळहळ

आणखी एक ‘भाविक’ हरपला; नाशिकचे प्रख्यात तबलावादक पंडित विजय हिंगणे यांचे निधन