द्राक्ष बागायतदारांना धाकधूक; 15 दिवस बेमोसमी पाऊस नको, अन्यथा तोंडाशी आलेला घास हिरावणार!

| Updated on: Sep 29, 2021 | 11:36 AM

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतदारांचे दाबे दणाणले आहे. आता किमान 15 दिवस तरी पाऊस थांबावा, अन्यथा त्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावणार आहे.

द्राक्ष बागायतदारांना धाकधूक; 15 दिवस बेमोसमी पाऊस नको, अन्यथा तोंडाशी आलेला घास हिरावणार!
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतदारांचे दाबे दणाणले आहे. आता किमान 15 दिवस तरी पाऊस थांबावा, अन्यथा त्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावणार आहे. (There is no need for 15 days of rain in Nashik district, otherwise there is a fear of major damage to the vineyards)

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या भयंकर पावसाने निफाड तालुक्यातील उगाव, शिवडी, खेडे परिसरात द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. सध्या द्राक्ष पिकाची गोडेबार छाटणी सुरू आहे, तर अनेक ठिकाणी बाग छाटणी करण्यात येत आहे. बाग छाटणीनंतर वीस दिवसांमध्ये परिपक्व डोळ्यातून घड बाहेर येतात. मात्र, या दिवसांमध्ये हे घड अतिशय नाजुक असतात. या परिस्थितीमध्ये नत्राचे प्रमाण वाढले, तर अनेकदा घड जिरतो. तर अनेकदा तो बाळीत बदलतो. जर नेमकी यावेळी पोंगा स्टेज असेल तर जास्त नुकसान होते. कारण त्यामुळे डाऊनी रोगाची भीती असते. या काळात द्राक्ष बागेसाठी पाऊस अतिशय मोठे संकट ठरू शकतो. त्यामुळे द्राक्ष बागयतदार हवालदिल झाले आहेत. द्राक्ष पिकावर खर्च जास्त करावा लागतो. त्याचे खतपाणी, फवारणी, औषध यामुळे अनेक बागायतदार मेटाकुटीला येतात. त्याच पिकाला चांगला भाव मिळाला नाही अथवा पावसाने पाणी फेरले, तर त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतो. गेल्या दहा वर्षांपासून बागयतदारांना बेमोसमी पावसाचा प्रचंड फटका सहन करावा लागत आहे. या वर्षी तर पावसाने उघडीप द्यावी. अन्यथा पीक मातीमोल होण्याची भीती आहे. दरम्यान, दुसरीकडे मालेगावमध्ये पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तब्बल सहा गावांमधील तीन हजार हेक्टरवरील पीक उद्धवस्त झाले असून, त्याचा जवळपास 5 हजार शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला दिला असून, लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

घराबाहेर न पडण्याचे आवाहन

नाशिकमध्ये 13 सप्टेंबर रोजी गोदावरीला पहिला पूर आला होता. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा पूर आला. काल सोमवारी पुन्हा एकदा गंगापूर धरणातून विसर्ग सुरू केल्याने वर्षातला तिसरा पूर गोदावरीला आला. सध्या नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे आज बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असून तो 15000 क्यूसेक पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी लगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (There is no need for 15 days of rain in Nashik district, otherwise there is a fear of major damage to the vineyards)

इतर बातम्याः

भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या; शिवसेना आमदार कांदेंना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीची धमकी

भिंत खचली, चूल विझलीः नाशिक जिल्ह्यात हाहाकार, दोघांचा बुडून मृत्यू; 3 हजार हेक्टरवरले पीक आडवे, गोदावरीला येणार महापूर