चार तरुण आंघोळीसाठी बंधाऱ्यावर गेले, दोन तरुणांचा बुडून मृत्यू

चार मित्र बंधाऱ्यावर गेले. पाण्याचा प्रवाह जोरात होता. त्यात दोन जण सापडले. यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला.

चार तरुण आंघोळीसाठी बंधाऱ्यावर गेले, दोन तरुणांचा बुडून मृत्यू
| Updated on: Jun 11, 2023 | 1:46 PM

नाशिक : उन्हाची काहीली चांगलीच वाढली आहे. पावसाची साऱ्यांना प्रतीक्षा आहे. अशावेळी पाण्यात डुबण्याचा मोह बऱ्याच जणांना होतो. पण, पाण्यात डुबताना काही काळजी घ्यावी लागते. अन्यथा होत्याचे नव्हते होते. अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली. चार मित्र बंधाऱ्यावर गेले. पाण्याचा प्रवाह जोरात होता. त्यात दोन जण सापडले. यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला. काल संध्याकाळी ही घटना घडली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत त्यांना पाण्याच्या प्रवाहात शोधण्याचे काम सुरू होते.

दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात बुडाले

नाशिकच्या दारणा नदीवरील महापालिकेच्या चेहेडी बंधाऱ्यात सिन्नरफाटा भागातील दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत या तरुणांचे शोधकार्य सुरु होते. चेहडी येथील दारणा नदीला आवर्तन सुरु आहे. नाशिक महापालिकेच्या चेहडी बंधाऱ्याचे गेट उघडण्यात आले आहे.

सिद्धार्थ आणि राहुल अशी मृतकांची नाव

या ठिकाणी चार युवक अंघोळीसाठी गेले होते. यातील दोन युवक सिद्धार्थ गांगुर्डे आणि राहूल महानुभाव हे दोघे पाण्याच्या उलट्या प्रवाहात सापडले. त्यानंतर त्यांना बाहेर निघणे मुश्किल झाले. त्यांच्या एका सहकारी मित्राने घरी येऊन ही घटना सांगितली. त्यांनी त्वरित आग्निशमन दलास कळविले. रात्री उशिरापर्यंत या युवकांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.

ही घटना चेहेडी बंधाऱ्यात घडली. हे तरुण सिन्नरफाटा भागातील आहेत. दुपारी उन्हाची तीव्रता खूप असते. अशावेळी पाण्यात शांत व्हावं, असं बहुतेकांना वाटते. यामुळे अशा दुर्दैवी घटना होतात. पाण्याचा अंदाज माहीत नसेल. पोहता येत नसेल. तर पाण्याशी आणि आगीशी कुणी खेळू नये. अन्यथा जीवावर बेतते.