Devendra Fadnavis : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची घोषणा
"शोषित, वंचित आणि मागास समाजाला आत्मसन्मना, अधिकार आणि समान संधी देण्यासाठी जीवन समर्पित केलं. शिक्षण मुक्तीचा मार्ग आहे हे आजही प्रासंगिक आहे. हाच सामाजिक न्यायाचा मजबूत पाया आहे"

आज बंगळुरुमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 11 वं अधिवेशन संपन्न होत आहे. सामाजिक न्याय आणि ओबीसींच्या हक्कांवर यामध्ये व्यापक चर्चा होईल. विविध मान्यावर या अधिवेशनाला मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनाला सुरुवात होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली आहे. जातीय जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश केला जाईल. त्याशिवाय अधिवेशनातील ठराव राज्य सरकार अंमलात आणेल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “ओबीसी महासंघाच्या 11 व्या अधिवेशनासाठी देशभरातून आलेले सर्व समाजातील प्रतिनिधी, माता-भगिनी, युवा सहकारी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी यांना माझा नमस्कार” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “महत्वपूर्ण अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाला शुभेच्छा देतो. हे अधिवेशन फक्त विचार-विनिमय करण्याचा मंच नाही, तर सामाजिक न्याय, समरसता आणि राष्ट्रीय निर्माणाला नवीन दिशा देण्याची संधी आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
“भारताचा आत्मा विविधतेत आहे. या विविधतेला शक्ती देणारा आधार सामाजिक समरसता आहे. आपल्या महापुरुषांनी भारत निर्माणाचा आपल्याला असा मार्ग दाखवला, ज्यात कुठल्याही व्यक्तीचं मूल्य त्याची जाती, पार्श्वभूमीवर यावर न ठरता प्रतिभा, चरित्र यावर ठरेल. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आधुनिक भारतात सामाजिक क्रांतीचा शंखनाद केला. शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचं सर्वात प्रभावी माध्यम बनवलं. शोषित, वंचित आणि मागास समाजाला आत्मसन्मना, अधिकार आणि समान संधी देण्यासाठी जीवन समर्पित केलं. शिक्षण मुक्तीचा मार्ग आहे हे आजही प्रासंगिक आहे. हाच सामाजिक न्यायाचा मजबूत पाया आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
ज्याने सामाजिक न्याय आणि समान संधी दिली
“क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला, वंचित समाजासाठी शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. त्यावेळी असं करण एक असाधारण साहस होतं. त्यावेळी अनेक अडचणींचा सामना केला पण सामाजिक सुधारणेचं कार्य सोडलं नाही. भारताची पहिली महिला शिक्षिका म्हणून त्यांचं योगदान सैदव प्रेरणास्त्रोत राहिलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला असं सविधान दिलं, ज्याने सामाजिक न्याय आणि समान संधी दिली. शिक्षण, संघटना, संघर्ष हा मंत्र दिला. त्यामुळे कोट्यवधी जीवनात आशेचा संचार झाला. ओबीसी समाज हा भारताच्या विकास यात्रेचा सशक्त आधार आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.