Devendra Fadnavis : पहिल्यांदाच घडलं… देवेंद्र फडणवीस आले, पण पदाधिकारी… थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार?

| Updated on: Oct 22, 2023 | 10:06 AM

काही लोक धर्मांतर घडवून आणत आहेत. नरेंद्र महाराज हे धर्मांतर करण्याचं षडयंत्र मोडून काढत आहेत. त्यामुळे महाराजांवर काहींचा राग होता. त्यामुळे त्यांच्यावर छापे टाकले. त्यांचं संरक्षण काढून घेतलं. पण इथे उपस्थित असलेले भक्तगण हेच महाराजांचं सुरक्षा कवच आहे.

Devendra Fadnavis : पहिल्यांदाच घडलं... देवेंद्र फडणवीस आले, पण पदाधिकारी... थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार?
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मनोज लेले, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, चिपळूण | 22 ऑक्टोबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस काल रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस हे नाणिजला एका धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेले. फडणवीस जिथे जातात तिथे त्यांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांचा मोठा ताफा असतो. पदाधिकारी आणि नेते त्यांच्या आसपास गर्दी करतात. मात्र, काल चित्र काही औरच होतं. फडणवीस यांच्या या दौऱ्यावेळी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नाणिज येथील कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. पण देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आले नाहीत. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यावेळी गैरहजर होते. फडणवीस नाणिजला गेले. तिथेही या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. फडणवीस यांना घेण्यासाठीही कुणी आलं नाही. त्यामुळे फडणवीस प्रचंड नाराज झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बावनकुळे, चव्हाणांकडे नाराजी

पदाधिकाऱ्यांनी आपल्या दौऱ्याकडे पाठ फिरवल्याने नाराज झालेल्या फडणवीस यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन लावला. पदाधिकारी कुठे आहेत? कार्यकर्ते कुठे आहेत? अशी विचारणा करत फडणवीस यांनी बावनकुळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. तसेच भाजपचे कोकणचे प्रमुख आणि राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडेही फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. त्यामुळे कालचा फडणवीस यांचा दौरा मानपमान नाट्याने रंगल्याचं चित्र आहे.

ग्रीन कॉरिडोअर सुरू करू

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी नाणिजच्या नरेंद्र महाराजांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावून मार्गदर्शन केलं. 2016 साली मुख्यमंत्री असताना नाणिजला आलो होतो. आज इथे येण्याची दुसर्‍यांदा संधी मिळाली. त्यावेळी दहा हजार जणांनी देहदानाचा संकल्प घेतला होता. महाराज आपण अवयव दानाची मोहीम सुरू केली तर त्याचा उपयोग अनेकांना होईल. अवयवदान निश्चत वेळेत करावे लागते आणि यासाठी नाणिज धाममधून आम्हाला सांगितले गेले तर ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

संस्कृती खिळखिळी करण्याचा प्रयत्न

जागतिक पातळीवर आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. पण भारतात अराजक निर्माण करून खिळखिळ करण्याचा प्रयत्न काही शक्तींनी सुरू केला आहे. जगातील सर्वाधिक काळ अखंडित सुरू असलेली संस्कृती म्हणजे आमची हिंदू आणि भारतीय संस्कृती आहेय 10 हजार वर्षापासून आजही ही संस्कृती सुरू आहे. जो शक्तिमान आहे तो जगेल म्हटलं जातं. पण आपली संस्कृती मानते की, जो जन्माला आला, तो जगेल. ही संस्कृती, हा संदेश आपल्याला आपल्या संतानी दिला, असं ते म्हणाले.