गजानन काळेच्या अटकेसाठी संजीवनी काळेंचे रामदास आठवलेंना साकडे

| Updated on: Aug 17, 2021 | 1:08 PM

MNS Gajanan Kale | गेल्या सहा दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची दहा पथके गजानन काळे यांचा शोध घेत आहेत. गजानन काळे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लवकरच ते पोलिसांच्या ताब्यात असतील, असा विश्वास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी व्यक्त केला.

गजानन काळेच्या अटकेसाठी संजीवनी काळेंचे रामदास आठवलेंना साकडे
Follow us on

नवी मुंबई: घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांच्या अटकेसाठी त्यांच्या पत्नीने आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याकडे धाव घेतली आहे. संजीवनी काळे आणि त्यांच्या परिवाराने मंगळवारी रामदास आठवले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. संजीवनी काळे यांच्या खळबळजनक आरोपांनंतर गजानन काळे फरार झाले होते.

गेल्या सहा दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची दहा पथके गजानन काळे यांचा शोध घेत आहेत. गजानन काळे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लवकरच ते पोलिसांच्या ताब्यात असतील, असा विश्वास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी व्यक्त केला.

गुन्हा दाखल झाल्यापासून गजानन काळे यांचा मोबाईल फोन स्वीच ऑफ आहे. गेल्या काही दिवसांत हे प्रकरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही संजीवनी काळे यांना पाठिंबा दर्शविला होता. नवी मुंबईतील नागरिकांनीही संजीवनी काळे यांना पाठिंबा दिला आहे.

महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून गृहमंत्र्यांची भेट

गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसंच पोलीस सेटलमेंटसाठी दबाव टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्यानंतर आता गजानन काळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी गृहमंत्र्यांनी या महिलांशी चर्चा केली होती.

गजानन काळे यांच्या पत्नीकडून कोणते खळबळजनक आरोप?

“2008 साली आमचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला. आम्ही कॉलेजात एकत्र होतो. आमची चांगली मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पुढे त्याने मला लग्नाची मागणी घातली. मी आमच्या बौद्ध धर्मातल्या मुलाशी लग्न करणार असल्याचं त्याला सांगितलं. ‘मी बौद्ध धर्म स्वीकारतो, पण माझ्याशी लग्न कर’, असं त्याने मला सांगितलं. घरच्यांच्या संमतीने आम्ही लग्न केलं. लग्नानंतरच्या केवळ 15 दिवसांनी गजानन माझ्यासोबत किरकोळ कारणांवरुन भांडण करु लागला. माझा सावळा रंग व माझी जात याच्यावरुन तो मला टोमणे मारू लागला. जातीवाचक शिवीगाळ करु लागला… मारहाण करु लागला”

घरगुती वाद आणि मारहाणीचा आरोप

“तो मला कायम बोलायचा की, तू सावळी आहेस… तुझी जात वेगळी आहे… तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट (हुद्दा) बघून मी तुझ्याशी लग्न केले, परंतु त्याचा मला काही एका फायदा झाला नाही, असं तो वारंवार बोलायला. तेव्हा आमच्या दोघांमध्ये या कारणांवरुन बऱ्याच वेळा भांडण झालं… जेव्हा जेव्हा भांडण होई त्यावेळी गजानन मला मारहाण करत असे. मग मी माहेरी जायचे. पुन्हा काही दिवस उटल्यानंतर गजानन मला फोन करुन माझी माफी मागायचा. पुन्हा असं होणार नाही, असं सांगून मला घरी आणायचा. पण काही दिवस सरले की त्याचं नाटक पुन्हा सुरु व्हायचं”, असंही त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

सेटलमेंटसाठी दबाव टाकल्याचा आरोप

संजीवनी काळे यांनी पोलिसांनी आपल्यावर सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. “त्यावरुन हे काय चाललंय राज्यात?” असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना विचारला आहे. “नमस्कार चित्राताई, मी संजीवनी गजानन काळे, मी 11 तारखेला माझे पती गजानन काळेंवर एफआयआर दाखल केली होती, तीन दिवस उलटून झाले आहेत, तरीसुद्धा त्यांना अरेस्ट झालेली नाही, मला न्याय मिळालेला नाही, मी पोलिसांकडे गेले होते काल, तर पोलिसांनी माझ्यावर प्रचंड मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला, सेटलमेंट करण्याचा विषय झाला” असं संजीवनी काळे व्हिडीओमध्ये म्हणतात.

संबंधित बातम्या :

अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

आधी विवाहबाह्य संबंधाचा दावा, आता आणखी एक गंभीर आरोप, गजानन काळेंच्या पत्नीने वात पेटवली