नवी मुंबईच्या मसाला मार्केटमधील अतिधोकादायक इमारतीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, दुर्घटनेची शक्यता

| Updated on: Jun 27, 2021 | 3:40 PM

APMC Navi Mumbai | एपीएमसीच्या कार्यकारी अभियंत्यांकडून मागीलवर्षी सुद्धा 12 लाख रुपये खर्च करून या इमारतीत लाकडी बांबू बांधून ताडपत्री टाकण्यात आली होती.

नवी मुंबईच्या मसाला मार्केटमधील अतिधोकादायक इमारतीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, दुर्घटनेची शक्यता
एपीएमसी मसाला मार्केट
Follow us on

नवी मुंबई: आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मसाला मार्केटमधील बहुउद्देशीय मध्यवर्ती इमारतीत हजारो लोक धोक्याच्या छायेत वावरत आहेत. तर मुसळधार पावसात (Rain) अनेक ठिकाणी होत असलेल्या इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ शकते. तरीही बाजार समिती प्रशासन थंडच असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Navi Mumbai APMC Masala market dangerous building)

नवी मुंबई महापालिकेने हि इमारत वर्षांपूर्वी अतिधोकादायक जाहीर करून या ठिकाणी असलेल्या 272 आस्थापना कार्यालयांना इमारत खाली करण्याची नोटीस दिली होती. मात्र, असे असताना सुद्धा या इमारतीत बाजार समिती कार्यालयासह अनेक आस्थापना कार्यरत आहेत. शिवाय लवकरात लवकर इमारतीतील लोकांना पर्यायी जागा उपल्बध करून इमारत खाली करण्याऐवजी या अतिधोकादायक इमारतीच्या टेरेसवर आणखी भार टाकण्याचे काम केले आहे. एपीएमसीच्या कार्यकारी अभियंत्यांकडून मागीलवर्षी सुद्धा 12 लाख रुपये खर्च करून या इमारतीत लाकडी बांबू बांधून ताडपत्री टाकण्यात आली होती.

यावर्षी सुद्धा जवळपास तेवढाच खर्च करून कितीतरी टन वजनाची लाकडे इमारतीच्या उरावर आणून ठेवली आहेत. ही इमारत कधीही कोसळू शकते असे जाहीर असताना या इमारतीच्या गच्चीवर छेडछाड करून हा उपद्व्याप करण्याची आवश्यकता काय? असा सवाल येथील आस्थापनाधारक विचारत आहेत.

महापालिकेकडून वेळोवेळी नोटीस दिल्या जात असताना या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट केले असून इमारतीची डागडुजी केली जाईल असे एपीएमसी प्रशासनाकडून सांगण्यात येते आहे. मात्र, याबाबत सुद्धा अद्याप कोणतीच कार्यवाही केली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या इमारतीती बाजार समिती कार्यालयासह बँक, पतसंस्था आदी कार्यालये आहेत. त्यामुळे या इमारतीती प्रतिदिन कोटींचा व्यवहार होतो. नवी मुंबई महानगरपालीकेच्या अहवालात इमारत अतिधोकादाय असून तसा फलकही या ठिकाणी लावण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक मंत्री, राजकीय नेते बाजारसमितीला भेट देऊन गेले. परंतु या गोष्टीत कोणीच लक्ष घालत नाहीत, असे येथील लोकांचे म्हणणे आहे.

35 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या मार्केटची इमारत प्रशासनाकडुन अतिधोकादायक घोषित करून इमारत तात्काळ खाली करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे. मात्र, आस्थापनाधारकांच्या पुनर्वसनाबाबत बाजार समिती प्रशासन ब्र सुद्धा काढत नसल्याचे येथील आस्थापनाधारक सांगत आहेत. याबाबत बाजार समितीची जबाबदारी असून सुद्धा ती नाकारण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत प्रशासन दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल विचारला जात आहे.

(Navi Mumbai APMC Masala market dangerous building)