उद्धव ठाकरे जिथे जिथे माझं नाव घेतील, तिथे हनुमान चालिसाचं पठन करेन, नवनीत राणा यांचा निश्चय!

आज महाविकास आघाडीचं सरकार नाहीये, त्यामुळे सगळे बिनधास्तपणे हनुमान चालिसा म्हणत आहेत, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलंय.

उद्धव ठाकरे जिथे जिथे माझं नाव घेतील, तिथे हनुमान चालिसाचं पठन करेन, नवनीत राणा यांचा निश्चय!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 06, 2023 | 2:04 PM

स्वप्निल उमप, अमरावती : उद्धव ठाकरे जिथे जिथे सभा घेतील तिथे तिथे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसाचं पठन करून ती जागा स्वच्छ करावी, असं वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलंय. एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी ज्या ज्या ठिकाणी मला काही संदेश देण्याचा प्रयत्न केला, तिथे तिथे मी स्वतः जाऊन हनुमान चालिसा पठन करून ती जागा पवित्र करेन, असा निश्चय नवनीत राणा यांनी बोलून दाखवला. अमरावतीत आज हमुमान जयंती आणि नवनीत राणा यांचा वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलयं. १५ एकरावर भव्य सभामंडप टाकण्यात आला असून हजारो भाविकांनी तेथे हनुमान चालिसा पठन केलं. यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसा म्हणण्यासाठी त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, त्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

रवी राणा काय म्हणाले?

मविआ काळातील देशद्रोहाचा गुन्हा आणि १४ दिवसांची जेल यावरून रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, रश्मी ठाकरे जेलमध्ये गेल्या तर उद्धव ठाकरे यांना कसे वाटेल? ज्या बाळासाहेब ठाकरेंनी महिलांचा सन्मान केला त्यांचा सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेल मध्ये टाकले.मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बाजूला ठेवले. एका महिला खासदाराला जेल मध्ये टाकण उद्धव ठाकरे यांनी केलं. आम्हाला एका गुन्हेगारासारख गाडीतून टाकून नेलं, आतंकवादी कसाब प्रमाणे आम्हाला जेल मध्ये नेऊन टाकलं. हनुमान चालीसा वाचणे हा गुन्हा असेल तर रवी राणा एकवेळा नाही तर हजार वेळा गुन्हा करेल. जेब कटर,दारू पिऊन जे लोक होते त्या लोकपमध्ये आम्हाला टाकलं. आम्ही जेलमध्ये असताना सर्व माहिती अनिल परब संजय राऊत घेत होते, असा आरोप रवी राणा यांनी केलाय.

तिथे तिथे हनुमान चालीसा- नवनीता राणा काय म्हणाल्या?

आज महाविकास आघाडीचं सरकार नाहीये, त्यामुळे सगळे बिनधास्तपणे हनुमान चालिसा म्हणत आहेत, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलंय. तसेच महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी आवाहन केलं. जिथे जिथे महाविकास आघाडीच्या, उद्धव ठाकरे यांच्या सभा होतील तेथील जागा हनुमान चालीसा म्हणून शुद्ध करा. तसेच ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे माझ्यासाठी संदेश देतील तिथे मी स्वतः हनुमान चालिसाचं पठन करेन, असा इशारा नवनीत राणा यांनी दिलाय.

Follow Us