दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले? शरद पवार यांनी सांगितले नेमके कारण

शरद पवार यांनी पक्षाचे दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले, यावर स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनीच सुप्रिया सुळे यांना जबाबदारी सोपवण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अजित पवार यांच्या नाराजीच्या प्रश्नच येत नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले? शरद पवार यांनी सांगितले नेमके कारण
Chetan Patil | Updated on: Jun 10, 2023 | 6:14 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा शरद पवारांनी केली. पण त्यानंतर दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्यामागील नेमकं कारण काय? अशा चर्चांना उधाण आलं. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कुठलीही नवी जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. या दरम्यान शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले याबाबत स्पष्टीकरण दिलं.

“आपण जाणता की आजच्या बैठकीत आम्ही राष्ट्रवादी पक्षाचं काम अन्य राज्यात कसं वाढवू शकतो याबाबत चर्चा करत होतो. यावेळी काही सहकाऱ्यांवर जबाबदारी दिली पाहिजे, त्यांनी महिन्यातील कमीत कमी चार दिवस दिल्ली आणि ज्या राज्याची जबाबदारी दिलीय त्या ठिकाणी जावून संघटना वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, अशी चर्चा झाली. मला आनंद आहे की, ही जबाबदारी काही सहकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“मी कार्यकारी अध्यक्ष नेमले आहेत. पुढच्या महिन्यात बैठक बोलावू. तुम्ही जाणता की प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपादासह विविध राज्यांची जबाबादारी देण्यात आली आहे”, असं शरद पवार म्हणाले.

दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले?

देशात आगामी काळात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रासह आणखी काही राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी याबाबत निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. “दोन गोष्ट आहेत. या देशाची रचना पाहिल्यानंतर, तीन, चार, पाच जे महत्त्वाची राज्य आहेत, सर्व राज्याची जबाबदारी एका व्यक्तीवर दिली तर आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही विविध सहकाऱ्यांना जबाबदारी देवून कामं वाटून घेतले आहेत जेणेकरुन आम्ही आगामी लोकसभे निवडणुकीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

“दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची निवड केली गेली त्यांच्याबाबत लोकांची मागणी होती की, त्यांना जबाबदारी देण्यात यावी. त्याचा विचार करुन जबाबदारी देण्यात आली आहे. एक मागणी होती किंवा माझं स्वत:चं मत होतं की आता इतरांच्या हाती जबाबदारी सोपवावी. पण इतर पक्षांनी राजीनाम्याला विरोध केला. अन्य सहकारी मला विविध राज्यांसाठी काम करतील तर मला मदत होईल”, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

‘भाजपची ताकद जिथे जास्त तिथे…’

“पुढच्या तीन-चार महिन्यात सर्व राज्यांमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. लोकसभेची निवडणूक प्रक्रिया सुरु होईल तेव्हा आम्ही इतर पक्षांना सोबत घेऊन पुढे जायला तयार आहोत. विरोधी पक्षांची 23 तारखेला बैठक आहे. त्या बैठकीला आम्ही जाणार आहोत. भाजप विरोधात आपण कसं लढू शकतो याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे”, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

“एक सल्ला असा आला आहे की, जिथे भाजपची शक्ती जास्त आहे तिथे इतर विरोधी पक्षांकडून एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न करावा असा मुद्दा आहे. याबाबत 23 तारखेला पाटण्याला होणाऱ्या बैठकीच चर्चा होईल. मला आशा आहे की, पाटण्याच्या बैठकीत नवी दिशा मिळेल”, असं शरद पवार म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us