राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये अभूतपूर्व वाद? शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची थेट ‘कॅटेगरी’च काढली

| Updated on: May 09, 2023 | 8:17 PM

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सध्या मतभेद सुरु असल्याचं चित्र आहे. या मतभेदांमागील कारण काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा दावा केला होता. त्या दाव्यावरुन शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना अतिशय खोचक टोला लगावला आहे. त्यावर नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये अभूतपूर्व वाद? शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची थेट कॅटेगरीच काढली
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मतभेद आता उघडपणे समोर येताना दिसत आहे. या वादामागील कारण म्हणजे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मोठा दावा केला होता. “राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरु आहे. राष्ट्रवादी आमच्यासोबत किती दिवस राहील हे माहित नाही. कर्नाटकातही राष्ट्रवादीने काँग्रेसविरोधात उमेदवार दिले आहेत”, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची थेट कॅटेगरी काय? असा प्रश्न विचारला.

“ते ठीक आहे. सध्या त्यांच्या पक्षात त्यांचं काय स्थान आहे ते ए आहेत का? बी आहेत का? सी आहेत का?, का डी आहेत?, ते पहिल्यांदा चेक करावं. आणि त्यांच्या पक्षातल्या कोणत्या तरी सहकाऱ्यांना विचारलं की, यांची कॅटेगरी कोणीत आहे? तर ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीर सांगणार नाहीत”, असा टोला शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला.

पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया काय?

शरद पवार यांच्या टीकेला पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं. “शरद पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना वडिलकीच्या नात्याने बोलायचा अधिकार आहे. बोलले तरी मला काही वाटत नाही. मी यापूर्वीही बरंच काही सहन केलेलं आहे”, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी भावना व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा

नाना पटोले म्हणतात, ‘पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षात नंबर 1 नेते’

शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं. “पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षात नंबर 1 नेते आहेत. ते नंबर 1 आहेत आणि नेहमी नंबर 1 राहतील. प्रदेशचा अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण आमचे नेते आहेत, ते आमचे नेतेच राहतील. कारण आज ज्या पद्धतीने भाजपच्या तानाशाही प्रवृत्तीविरोधात लढण्याची क्षमता असलेले काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण सारखा नेता आहे त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे”, असं नाना पटोले म्हणाले.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठचं काय?

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागला आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकसंध राहणं जास्त गरजेचं आहे, अशी भावना मविआ नेत्यांकडूनच व्यक्त करण्यात येतेय. पण दुसरीकडे मविआ नेते एकमेकांच्या विरोधात भूमिका मांडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांवरुन तीन पक्षांमध्ये मतभेद सुरु झाल्याचंदेखील चित्र आहे. त्यामुळे मविआच्या वज्रमूठचं काय होणार? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.