Nanded Rain: …अजून सरकार जाग्यावर नाही; राज्यात अतिवृष्टीचे संकट; जयंत पाटील यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील गावांची पाहणी

राज्यात पूरपरिस्थितीने जनता संकटात असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन पंधरा दिवस झाले आणि गुवाहाटीतील पंधरा दिवस असा महिना उलटला तरी सरकार तयार झाले नाही. कुणाला किती खाती द्यायची आणि कुणाचे किती मंत्री घ्यायचे याच्यातच यांचा वेळ जात असल्याचा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला आहे

Nanded Rain: ...अजून सरकार जाग्यावर नाही; राज्यात अतिवृष्टीचे संकट; जयंत पाटील यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील गावांची पाहणी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 14, 2022 | 7:45 PM

मुंबई: महाराष्ट्रातील जनतेसमोर निसर्गाने संकट उभे करुन मोठे प्रश्न निर्माण केले आहेत मात्र अजूनही सरकार (Shinde-Fadnavis Government ) जाग्यावर आलेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन करुन लोकांना तात्काळ मदतकार्य सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP state president and former water resources minister Jayant Patil) यांनी केली आहे. आज मंत्री जयंत पाटील नांदेड दौर्‍यावर होते, यावेळी त्यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांची व शेतीची पाहणी केली.

 

निळा, आलेगाव, एकदरा गावांची पाहणी

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीचे संकट असून वसमत परिसरात ढगफुटी झाल्याने नदीचे पाणी नदीपात्रातून गावामध्ये शिरले आहे. आज नांदेड दौऱ्यावर असताना निळा, आलेगाव, एकदरा या गावांची पाहणी जयंत पाटील यांनी केली.

पाण्याचा संपूर्ण गावाला वेढा

संपूर्ण गावाला पाण्याने वेढा घातला असून ऊस, सोयाबीनची पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने यात तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांसाठी जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.

सगळा वेळ खातेवाटपातच जाणार का?

राज्यात पूरपरिस्थितीने जनता संकटात असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन पंधरा दिवस झाले आणि गुवाहाटीतील पंधरा दिवस असा महिना उलटला तरी सरकार तयार झाले नाही. कुणाला किती खाती द्यायची आणि कुणाचे किती मंत्री घ्यायचे याच्यातच यांचा वेळ जात असल्याचा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला आहे.