Kolhapur : कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसूत्र काढणे या प्रथा बॅन! विधवांना सन्माननं जगण्याचा अधिकार देणारं हेरवाड गाव

| Updated on: May 10, 2022 | 12:38 PM

लवकरच शिरोळ तालुक्यातील सर्व सरपंचांची या विषयावर कार्यशाळा आयोजित करून संपूर्ण शिरोळ तालुका विधवा प्रथामुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Kolhapur : कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसूत्र काढणे या प्रथा बॅन! विधवांना सन्माननं जगण्याचा अधिकार देणारं हेरवाड गाव
कोल्हापूरच्या गावातील आदर्श निर्णय
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

कोल्हापूर – कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातल्या हेरवाड (Herwad)गावात महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव संमत केला आहे. विशेष म्हणजे पतीच्या निधनानंतर विधवा समजून तिची आभूषणे काढणे, कुंकू पुसणे यांसह अन्य प्रकारे छळ करण्याची प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. याबाबतचा ठराव हेरवाडच्या ग्रामसभेत संमत करण्यात आला आहे. विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने उचलेले पाऊल हे खरोखर कौतुकास्पद आहे. हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या चांगल्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यात चांगली चर्चा आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व ग्रामपंचायतीला दिशादर्शक असून हे चळवळीचे लोण महाराष्ट्रातचं नव्हे तर भारतात पसरणार आहे.

फुले शाहू आंबेडकर यांच्या कामाला तोडच नाही

खरंतर विधवा महिलांच्या प्रश्नावर पूर्वी पासून अनेकांनी खूपच चांगले काम केले आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या कामाला तोडच नाही. डॉ. नरेंद दाभोलकर व त्यांच्या टीममुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आला. विधवा महिलांच्या पुनर्विवाह, आरोग्य, आर्थिक, मुलांचे शिक्षण, अलीकडे कोरोनामुळे झालेल्या विधवा महिला यांचा प्रश्न दुर्लक्षित राहिला आहे.

पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरचा कुंकू यांसह, मंगळसूत्र तोडणे. बांगड्या फोडणे , पायातील जोडवी काढणे व काही ठिकाणी हे साहित्य पतीच्या अग्नीत टाकणे हा प्रकार तिच्या इच्छा विरोधी आहे. तसेच मरेपर्यंत तिला सर्व प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. सतीची प्रथा बंद झाली त्या पध्दतीने ही विधवा प्रथा बंद करण्यासाठी कायदा व्हायला पाहिजे किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. या हजारो वर्षांपासून आलेल्या अनिष्ट प्रथेला कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी हा विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियान प्रेम बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून प्रकाश झिंजाडे हे काम करीत आहेत.

विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर

हेरवाड गावात ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर केला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीला दिशादर्शक असून हे चळवळीचे लोण महाराष्ट्रातचं नव्हे तर भारतात पसरणार आहे. लवकरच शिरोळ तालुक्यातील सर्व सरपंचांची या विषयावर कार्यशाळा आयोजित करून संपूर्ण शिरोळ तालुका विधवा प्रथामुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

इतर ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा

विधवा महिलांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे हक्क त्यांना देण्यासाठी ही प्रथा बंद करण्याची गरज आहे. या अभियानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव संमत करण्यात आला असून शिरोळ तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी सदर ठराव संमत करून शासनाकडे पाठवावा असे आवाहन हेरवाड गावचे सरपंच सुरगोंडा पाटील यांनी केले आहे.