
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्क बसला. बारामती विमानतळावर घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य सुन्न झालं. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजितदादा जे काही म्हणाले ते आठवून बंगल्याचे अधिकारी भावूक झाले आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पुण्याला परत जाताना अजित दादा यांनी नागपूरातील विजयगड बंगल्यातील झाडांचे फोटो काढले, आणि आपल्या खास शैलीत अधिकाऱ्यांना सांगीतलं… “मी परत येणार, इथली झाडं, वस्तू जशाच्या तशा असायला हव्या. आज अजित दादा नाही, पण विजयगड बंगल्यातील प्रत्येक रोपटं, झाडं, इथली वास्तू अजीत दादांच्या वास्तव्याची साक्ष देतात. विजयगड बंगल्याचे अधिकारी राजेंद्र बारई यांनी अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
नागपुरातील अजित दादांचा शासकीय बंगला ‘विजयगड’ मधील आजचे वातावरण खूप वेगळे आहे. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर 2024च्या हिवाळी अधिवेशनाच्या 22 दिवसांपूर्वी ‘विजयगड’ बंगला तयार करण्यात आला होता. बंगल्याची डागडुजी करताना दादांनी स्वतः काही सूचना दिल्या होत्या. बंगल्यात नीटनेटकेपणा, सोबरनेस, वायरचा एक तुकडाही दिसता कामा नये अश्या सूचना दादांनी दिल्या होत्या. तसेच बंगल्याचे बांधकाम करताना भेटायला येणाऱ्या लोकांची खास काळजी घेण्याच्या सूचना दादांनी दिल्या होत्या.
अजित पवार यांचे अपघाती निधन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. विमान आकाशात असताना स्फोट झाला. त्यानंतर विमान थोडे झुकले आणि विमानतळाच्या आधीच एका शेतात कोसळले. त्यानंतर विमानाचे आणखी दोन-तीन स्फोट झाले. विमानात अजितदादांसह असलेल्या चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक प्रमुख नेते त्यावेळी उपस्थित होते.