धाराशिव पोलिसांची राज्यात चर्चा, टेक्नोलॉजीचा परफेक्ट वापर! काय आहे ई मुद्देमाल उपक्रम? QR कोड स्कॅन करताच…

गुन्ह्यात जप्त केलेल्या वस्तू न्यायालयाच्या आदेशाने किंवा निकाल लागल्यानंतर फिर्यादीला परत कराव्या लागतात. त्यावेळी त्या सापडणे व देणे सोपे होते, अशा वेळी धाराशिव पोलिसांचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.

धाराशिव पोलिसांची राज्यात चर्चा, टेक्नोलॉजीचा परफेक्ट वापर! काय आहे ई मुद्देमाल उपक्रम? QR कोड स्कॅन करताच...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2023 | 11:39 AM

संतोष जाधव, धाराशिव | तंत्रज्ञानाची (Technology) नाडी ओखळत आपल्या क्षेत्रात त्याचा वापर करुन घेतला तर गोष्टी किती सोप्या होतात, हे धाराशिवच्या (Dharashiv) पोलिसांनी दाखवून दिलंय. धाराशिव शहरातील दोन पोलीस ठाण्यांनी टेक्नोलॉजीचा वापर तपासकामासाठी असा काही केला की काही सेकंदात संबंधित केसची सर्वच माहिती समोर येते. ना फायलींची शोधाशोध, ना सुरक्षेची भीती. धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ई मुद्देमाल हा उपक्रम राबवला जातोय. ढोकी व आनंद नगर पोलीस ठाण्यात सुसज्ज यंत्रणा तयार केली आहे. या उपक्रमामुळे पोलिसांना तपासात मदत होत असून गुन्ह्यात शिक्षा होण्याचे प्रमाणही वाढत आहे. गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल एका बॉक्समध्ये ठेवण्यात आला. त्याला गुन्ह्याच्या नंबरसह डिजिटल बार कोडींग केले . त्यामुळे अवघ्या काही मिनिटात क्यूआर कोड स्कॅन केल्यावर मुद्देमाल सापडतो. शिवाय तो सुरक्षित राहतो. तांत्रिक दृष्ट्या विश्लेषण करुन तपास केल्यानंतर हा महत्वाचा पुरावा कोर्टात सुनावणीवेळी सादर करता येतो.

वेळेत मोठी बचत

क्यूआर कोड दिल्याने तो मोबाईलद्वारे स्कॅन केल्यानंतर तो कोणत्या बॉक्समध्ये ठेवला आहे व त्यात जप्त केलेल्या मुद्देमालाचे वर्णन असते त्यामुळे तो शोधण्याचा वेळ वाचतो. सर्वसाधारणपणे गुन्ह्यात वापरलेली व तपासात जप्त केलेल्या वस्तू पोलीस ठाण्यात अस्ताव्यस्त पडलेल्या असतात मात्र धाराशिव जिल्ह्यात मात्र हे चित्र बदलले असुन त्यात एक सुसुत्रा आली आहे.

स्वतंत्र ई मुद्देमाल रुम

ई मुद्देमालसाठी एक स्वतंत्र रूम तयार करण्यात आली असुन त्यात रॅकमध्ये वेगवेगळे बॉक्स कोडींग करुन ठेवले आहेत. त्यामुळे वेळेची बचत होत आहे.जप्त केलेल्या वस्तू, कपडे हे फॉरेन्सिक विश्लेषणसाठी पाठवण्यापूर्वी सुरक्षित ठेवले जातात. त्यामुळे तपासात फायदा होत आहे. ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश राऊत व आनंद नगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी ई मुद्देमाल कक्ष तयार करीत कर्मचारी यांना याचे प्रशिक्षण दिले आहे. धाराशिव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत व एम रमेश हे तीन आयपीएस दर्जाचे अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण व संवर्धन, कायदा जनजागृती शिबीर, तरुणांना प्रशिक्षण व नौकरी मार्गदर्शन, पिंक पथक, सायबर व इतर कायदेविषयक जनजागृती असे उपक्रम राबविले जात आहेत.

जिल्ह्यात सर्वत्र राबवणार

सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून त्याच्या सुरक्षिततेसाठी धाराशिव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी ई मुद्देमाल, कॉन्स्टेबल प्रथम, उत्कृष्ट तपास यासह विविध प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जात आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. इतर पोलीस ठाण्यात ई मुद्देमाल कक्ष सुरु करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीचा प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर हा पॅटर्न सर्वच ठाण्यात करण्यात येणार आहे असे कुलकर्णी म्हणाले.

पोलिसांचे वेगवेगळे टप्प्यात काम, कॉन्स्टेबल प्रथम

छत्रपती संभाजी नगर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के एम प्रसन्ना यांच्या सूचनेनुसार धाराशिव जिल्ह्यात वेगवेगळ्या टप्प्यात काम सुरु आहे. सर्व अंमलदार यांना बिटनुसार वेगवेगळे काम सामान पद्धतीने दिले जात आहे. गुन्ह्यांचा तपास, उकल,प्रतिबंध व दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे, नागरिकांची सुरक्षा, समन्स बजावणी, आरोपी अटक व इतर कामे दिली आहे त्यावर नियंत्रणसाठी एक अधिकारी नेमला आहे असे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. नागरिकांसाठी सुविधा कक्ष तर अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी डिजिटल रूम, सीसीटीएनएस असे पोलीस ठाण्याचे रुपडे पालटले गेले आहे.