MSEDCL | चंद्रपुरात महावितरणचा 1 हजार 161 आकडे बहाद्दरांना दणका; वीज चोरी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे

| Updated on: Apr 29, 2022 | 10:30 AM

महावितरणनं 1 हजार 161 आकडे बहाद्दरांना दणका दिलाय. वीज चोरी करणाऱ्यांच्या विरोधात तीव्र मोहीम उघडली आहे. वीज चोरी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे होणार दाखल होणार आहेत. आकडे बहाद्दरांवर करडी नजर आहे. संध्याकाळी, रात्री व पहाटे अकस्मात भेटी देत तपासणी केली जात आहे.

MSEDCL | चंद्रपुरात महावितरणचा 1 हजार 161 आकडे बहाद्दरांना दणका; वीज चोरी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे
चंद्रपुरात महावितरणचा 1 हजार 161 आकडे बहाद्दरांना दणका
Image Credit source: tv 9
Follow us on

चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळ (Chandrapur Circle) अंतर्गत  वीज तारांवर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या 1 हजार 161 आकडे बहाद्दरांना दणका  देत त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात आली.  कारवाईमुळे त्या-त्या भागातील वीज वाहिन्या (Power Lines) आकडेमुक्त व भारमुक्त झाल्या आहेत. यापुढेही ही कारवाई अशीच सुरु ठेवण्यात येणार आहे. चंद्रपूर मंडळातील चंद्रपूर, वरोरा व बल्लारशा तर गडचिरोली मंडळातील (Gadchiroli Circle) गडचिरोली, आलापल्ली व ब्रम्हपुरी विभागातील 210 कृषी व 951 अकृषी वीज चोरांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरीकरिता आकड्यांसाठी वापरण्यात येणारे साहित्य वायर, फ्युज इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

रात्री, पहाटे अकस्मात कारवाई

सध्याची वाढती वीज मागणी व अपुरा पुरवठा यातील तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. वीज चोरांवर कारवाई हा त्याचा एक भाग आहे. वाढत्या वीज चोरींमुळे वीज हानी वाढून वीज यंत्रणेवर ताण येतो. वीज पुरवठा व मागणीचे गणित बिघडते. विजेच्या अनधिकृत वापराचा परिणाम वीज उपलब्धतेवर होऊन प्रामाणिक ग्राहकांना नाहक त्रास होतो. त्यामुळे अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्राची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत चंद्रपूर परिमंडलात आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या 210 कृषी व 951 अकृषी वीज चोरांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली. या सर्वांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कारवाई करण्यात आलेल्या आकडे बहाद्दरांवर करडी नजर ठेवत त्यांच्या परिसरात संध्याकाळी, रात्री व पहाटे अकस्मात भेटी देत तपासणी सुरू आहे.

आलापल्ली विभागात सर्वाधिक कारवाई

चंद्रपूर मंडळातील 24 कृषी तर 267 अकृषी वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यात वरोरा विभागात सर्वाधिक 21 कृषी तर बल्लारशा विभागात सर्वाधिक 212 अकृषी वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली. गडचिरोली मंडळातील 186 कृषी व 684 अकृषी वीज चोरांविरुद्ध करवाई करण्यात आली. आलापल्ली विभागात सर्वाधिक कृषी 70, गडचिरोली विभागात 69 व ब्रम्हपुरी विभागात 44 कृषी वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. तसेच आलापल्ली विभागात सर्वाधिक 125 अकृषी, गडचिरोली विभागात 56 व ब्रम्हपुरी विभागात 5 अकृषी वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

कारवाई सुरूच राहणार

महावितरणचे मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर ग्रामीण मंडलच्या अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे, गडचिरोली मंडलचे अधीक्षक अभियंता रवींद्र गाडगे व चंद्रपूर, वरोरा, बल्लारशा, गडचिरोली, आलापल्ली व ब्रम्हपुरीचे कार्यकारी अभियंते व त्यांच्या सहकार्याने ही कारवाई केली. आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांच्या विरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज वापर करावा अनधिकृत वीज वापर करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी दिला आहे.