Video Chandrapur Flood : चंद्रपुरातील नांदा पुलावरून बैलगाडी नाल्यात पडली, दोन शेतकऱ्यांसह बैलगाडीला बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश

नांदा येथील नाल्यात बैलजोडीसह दोन शेतकरी वाहून जात आहेत. त्यांना वाचविण्यासाठी काही जणांनी पाण्यात उडी मारली.

Video Chandrapur Flood : चंद्रपुरातील नांदा पुलावरून बैलगाडी नाल्यात पडली, दोन शेतकऱ्यांसह बैलगाडीला बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश
दोन शेतकऱ्यांसह बैलगाडीला बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश
| Edited By: | Updated on: Jul 17, 2022 | 3:06 PM

चंद्रपूर : नाल्याच्या पुरात बैल गाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नांदा (Korpana Taluka Nanda) येथील नाल्याला महापूर आलाय. गेले 10 दिवस हा नाला पुराच्या पाण्याने भरून वाहतोय. पुलाच्या पलीकडे असलेल्या सात ते आठ गावांना हा नाला पार करून शेतशिवारात (Shetshiwar) जावे लागते. गेली 15 वर्षे या नाल्यावर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी सरकार दरबारी रखडली आहे. हाच रस्ता पुढे कोरपना- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. मात्र यामार्गे असलेला बारमाही नाला विकासात अडसर ठरलाय. शेतीच्या अत्यावश्यक कामांसाठी बैलगाडीत असलेल्‍या दोघांसह पुरातून वाट काढत असताना प्रचंड प्रवाहामुळे बैलगाडी वाहून गेली. नदीच्या काठावर असलेल्या ग्रामस्थांनी धावाधाव करत मदत केल्याने बैलजोडी व गाडीतील दोघांचे प्राण वाचले. गहिनीनाथ वराटे (Gahininath Varate) असे वाचलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

व्हिडीओत नेमकं काय

बैलगाडी वाचवितानाचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. नांदा येथील नाल्यात बैलजोडीसह दोन शेतकरी वाहून जात आहेत. त्यांना वाचविण्यासाठी काही जणांनी पाण्यात उडी मारली. तीन-चार जणांनी मिळून बैलगाडीचा मार्ग पुरातून बदलविला. बैल गाडीसह पुराच्या बाहेर आले. बंडी उलारली होती. ती शेतकऱ्यांनी मिळून सरळ केली. त्यानंतर बैल बंडीसह पुराच्या बाहेर आले. शेतकरीही बाहेर निघाले.

पाहा व्हिडीओ

आजारी युवकाला पोहचविले रुग्णालयात

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात तोहोगाव हे खेडे वर्धा नदीच्या पुरात चहूबाजूंनी वेढले. अशातच गावातील साहिल वाघाडे या 17 वर्षीय तरुणाला ब्रेन मलेरिया झाल्याने प्रकृती अत्यवस्थ झाली. मात्र गावाच्या चहूबाजूने पाण्याचा वेढा असल्याने त्यांचे उपाय खुंटले. ग्रामस्थांनी तहसीलदारांना मदत मागितली. मात्र 108 रुग्णवाहिका घेऊन निघालेले तहसीलदार के. डी. मेश्राम जंगलातील वाटेत झाडे उन्मळून पडल्याने वाटेतच थांबले. ही माहिती कळताच कोठारी येथील ठाणेदार तुषार चव्हाण यांनी आडवाटेने या गावातील नदीचा दुसरा किनारा गाठला. स्वतः नावाडी होत साहिलला नावेत बसवून 108 रुग्णवाहिकेपर्यंत पोचविले. या दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या धावपळीमुळे साहिल रुग्णालयात पोचल्याने त्याचा जीव वाचला. तोहोगावच्या ग्रामस्थांनी तहसीलदार के. डी. मेश्राम आणि ठाणेदार तुषार चव्हाण यांचे आभार मानले आहेत.