महाविकास आघाडीमध्ये दूध साखरेसारखी ‌गोडी, आदित्य ठाकरेंची बाळासाहेब थोरातांसमोर चौफेर फटकेबाजी

| Updated on: Oct 31, 2021 | 7:13 PM

आज संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे दंडकारण्य अभियान सांगता सोहळ्यात बोलताना अदित्य‌ ठाकरे यांनी हे वक्तव्य केलय. महाविकास आघाडी सरकार म्हणजे आमचे दूध आणि साखरे एवढे गोड संबंध आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीमध्ये दूध साखरेसारखी ‌गोडी, आदित्य ठाकरेंची बाळासाहेब थोरातांसमोर चौफेर फटकेबाजी
आदित्य ठाकरे
Follow us on

अहमदगर(संगमनेर): गेल्या दीड दोन वर्षापासून आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करतोय. आमच्यातील वातावरण विश्वासच असलं पाहिजे. शिवसेना आपल्या पोटात कधीच काही ठेवत नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. आज संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे दंडकारण्य अभियान सांगता सोहळ्यात बोलताना अदित्य‌ ठाकरे यांनी हे वक्तव्य केलय. महाविकास आघाडी सरकार म्हणजे आमचे दूध आणि साखरे एवढे गोड संबंध आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

दुधात साखर मिसळते तसं एक झालोय

आता साखरेत ही अनेक प्रकार आलेत. कोणी साखर घेतं, कोणी गूळ घेतो मात्र सगळं थोडं थोडं घ्यायच असतं. बाळासाहेब थोरात यांच्या दुधसंघात गेल्यावर मला कळलं की महाविकास आघाडी म्हणजे दुधात जशी साखर मिसळते तसे आम्ही एक झालो आहोत, असं वक्तव्य पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाषणातून केलंय.

शिवसेनेच्या खासदारांकडून गौप्यस्फोट

गेल्या 16 वर्षांपासून संगमनेर तालुक्यात महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळ्यात वृक्षारोपण करत दंडकारण्य अभियान राबविले जाते.आज दंडकारण्य अभियानाचा सांगता सोहळा पार पडला.राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते.विशेष म्हणजे यावर्षी महाविकास आघाडी स्थापन झाल्याने दंडकारण्य सोहळ्याला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अनेक गुपिते उघड करत 2014 ला बाळासाहेब थोरात यांनी मला निवडणुकीत छुपी मदत केल्याचा गौप्यस्फोट भाषणातून केला. तर, 2019 ला विखेंच्या मदतीने खासदार झाल्याने आज आई जेवू देईना आणि बाप भीक मागू देईना अशी माझी अवस्था झालीय, असे वक्तव्य केल्यानंतर सभेत एकच हशा पिकला.

आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम देशाचं नेतृत्त्व करतील

आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम हे नवीन नेतृत्व असून भविष्यात देशाचं नेतृत्व ही त्यांना करावं लागेल‌. देशाचं नेतृत्व मिळालं तर महाराष्ट्राचा लौकिक वाढवतील असं दोघांचं व्यक्तिमत्त्व असल्याचे गौरद्गार महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी काढले. तर कोरोनामुळे आर्थिक अडचणी असताना विकासाकडे आम्ही लक्ष देत आहोत. मात्र काही मंडळी रोज देव पाण्यात बुडवून बसलीय.तर काही जण स्वप्न पाहताय तर काही जण स्वप्नात बडबडतायत, असा टोला विरोधकांना लगावताना पुढील तीन वर्ष सुद्धा एकत्र पद्धतीने महाविकास आघाडी काम करेल असा विश्वास महसूलमंत्री थोरात यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या:

सरकार कधी जातंय यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवले, बाळासाहेब थोरातांचा भाजप नेत्यांना टोला

आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं कसं मिळालं? बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं?

Aditya Thackeray said Mahavikas Aaghadi is bonded like Milk and Sugar