शेतात काम करत असताना माशीची अंडी डोळ्यात गेली; त्यानंतर घडला हा धक्कादायक प्रकार

माशीची कीड ही फक्त कांदा आणि लसूण या दोनच पिकांवर असते. ती जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा कांद्याच्या पाकळीत आपले अंडी घालत असते.

शेतात काम करत असताना माशीची अंडी डोळ्यात गेली; त्यानंतर घडला हा धक्कादायक प्रकार
| Edited By: | Updated on: Apr 04, 2023 | 2:09 PM

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील वळण गावात शेतातील कांदा काढत असताना मजुरांच्या डोळ्यात जळजळ होत होती. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नेत्रतज्ज्ञांकडे तपासणी केली. त्यावेळी धक्कादायक प्रकार समोर आलाय. मजुराच्या डोळ्यात अळी तयार होत असल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केलीय. शेतात काम करत असताना कांदा माशीने जमिनीत दिलेली अंडी मातीबरोबर डोळ्यात उडालीत. ही अळी डोळ्यात तयार झाल्याची माहिती कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ भारत पाटील यांनी दिलीय.

माशीची कीड ही फक्त कांदा आणि लसूण या दोनच पिकांवर असते. ती जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा कांद्याच्या पाकळीत आपले अंडी घालत असते. तीच अंडी कांदा काढत्यावेळी मजुरांच्या डोळ्यात गेली. त्यातूनच अळ्या निघण्याचा प्रकार घडला. मात्र यामध्ये शेतकऱ्यांनी घाबरून जाण्यासारखे काहीही नाही. काळजी घेण्याची गरज असल्याचं शास्त्रज्ञ डॉ. भारत पाटील म्हणाले.

मजुरांवर खासगी रुग्णालयात उपचार

या प्रकारामुळे मोलमजुरी करणारे नागरिक भयभित झाले आहेत. सुरुवातीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिथे कोणताही उपचार मिळाला नाही. त्यामुळे मजुरांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

झालेला प्रकार अतिशय दुर्मीळ

झालेला हा प्रकार अतिशय दुर्मीळ आहे. एकाचवेळी पंधरा-वीस जणांना याची बाधा झाली आहे. शेतमजुरांनी शेतात काम करताना सेफ्टी गॉगल घालावेत, असा सल्ला नेत्ररोग तज्ज्ञांनी दिला. तसेच वेळीच उपचार केले इतर इतर व्याधी होत नाहीत असं नेत्रतज्ज्ञ डॉक्टर अभिषेख शिंदे म्हणताहेत.

मजुरांच्या डोळ्यात अळ्या आढळल्या

ही कांदा कीड यापूर्वी उत्तर भारतात आढळायची. परंतु आता अशी कीड महाराष्ट्रात आढळली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालंय. राहुरी तालुक्यात कांद्याच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या डोळ्यात अळ्या आढळल्या. यामुळे खळबळ उडाली आहे. शेतात काम करताना माशीची अंडी डोळ्यात उडाल्याने हा प्रकार झाल्याचं शास्त्रज्ञ म्हणताहेत.