बागेश्वर बाबाचे साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; शिर्डीतील भाविक का झालेत आक्रमक?

साईबाबांनी त्यांच्या हयातीत वैदिक परंपरा जपल्या. त्यामुळे साई संस्थानकडून साई मंदिरात आजही वैदिक परंपरा जपल्या जातात.

बागेश्वर बाबाचे साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; शिर्डीतील भाविक का झालेत आक्रमक?
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 02, 2023 | 3:09 PM

शिर्डी : बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वर बाबा ऊर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिर्डी ग्रामस्थांनी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. एका विशिष्ट विचारसरणीचे लोक साईबाबांविषयी नेहमीच अशी वक्तव्ये करत असतात. साईबाबा देव आहेत की नाही यासाठी धीरेंद्र शास्त्रीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. धिरेंद्र शास्त्रींनी एकदा साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत यावे. त्यांची अक्कल ठिकाणावर येईल, अशा भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केल्यात.

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांच्या विधानाचा शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी निषेध केला. धिरेंद्र शास्त्रीने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केलीय.

धिरेंद्र शास्त्रीने साईबाबांविषयी केलेले वक्तव्य म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया साईभक्त सुभाष देशमुख, शिर्डी ग्रामस्थ सचिन चौगुले आणि रवींद्र गोंदकर यांनी दिली.

साईबाबांनी वैदिक परंपरा जपल्या

साईबाबांनी त्यांच्या हयातीत वैदिक परंपरा जपल्या. त्यामुळे साई संस्थानकडून साई मंदिरात आजही वैदिक परंपरा जपल्या जातात. साईबाबांना नावं ठेवणारी अनेक लोकं आजपर्यंत आली गेली. मात्र आम्ही बाबांच्या शिकवणुकीप्रमाणे चालतो. धिरेंद्र शास्त्रीने महाराष्ट्राची संत परंपरा समजून घ्यावी. साईभक्तांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करू नये, असा सल्ला साई मंदिराचे सेवानिवृत्त पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी धिरेंद्र शास्त्रींना दिलाय.

सवंग लोकप्रियतेसाठी

धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याचा महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. सातत्याने अशा प्रकारचे वक्तव्य करणं चुकीचं आहे. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी महाराजांचे थोतांड आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेले आव्हान ते स्वीकारू शकत नाहीत.
बाबालोक देवाचे रूप घेऊन लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण करताहेत. सामाजिक अशांतता निर्माण करत असल्याच विखे पाटील यांनी म्हंटलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us