भाजपची सत्ता किती राज्यात? ताकद घटलीय? शरद पवार यांनी आकडाच सांगत केलं मोठं विधान

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. पवार यांनी यावेळी मीडियाशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

भाजपची सत्ता किती राज्यात? ताकद घटलीय? शरद पवार यांनी आकडाच सांगत केलं मोठं विधान
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 07, 2023 | 1:34 PM

पंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. शरद पवार आज सोलापुरात आले. सोलापुरात एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पंढरपुरात आले. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचं किती राज्यात अस्तित्व आहे याचा आकडाच सांगितला. तसेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काय घडेल याचं भाकीतही त्यांनी केलं.

हरयाणात भाजप नाही, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, पश्चिम बंगालमध्ये भाजप नाही. संपूर्ण देशाचा नकाशा पुढे ठेवला तर फक्त पाच ते सहा राज्यात भाजप आहे. बाकी सर्व ठिकाणी नॉन भाजप आहे. देशभरात भाजपची घसरण सुरू आहे. आता लोकसभेत काय होईल हे सांगू शकणार नाही. पण लोकसभा आणि विधानसभा एकत्र होईल का? याचा निकाल आज सांगता येत नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

कर्नाटकात काँग्रेसच

कर्नाटकात भाजपची सत्ता येणार नाही. काँग्रेसची सत्ता येईल, असा दावाही त्यांनी केला. सुप्रिया सुळेंना सात वेळा संसदपटू पुरस्कार दिला आहे. आता हे आठवी वेळ आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. सुप्रिया सुळे यांच्यावर इतर कोणताही जबाबदारी देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एका वर्षात लोकसभेची निवडणूक आहे. तोपर्यंत आम्ही कोणतीही जबाबदारी घेणार नाही. फक्त मतदारांची जबाबदारी घेऊ असं सुप्रिया सुळे यांनीच सांगितलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पोरासोरांवर मी काय बोलावं?

संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यावर शरद पवार यांना विचारण्यात आलं. सीरिअस बोलण्यासाठी ज्यांचा लौकीक आहे. त्यावर मी बोललं पाहिजे. त्याबद्दल मला विचारा. पोरासोरांच्या विधानावर मी काय बोलावं? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

सरकारचं धोरण योग्य नाही

सरकार शेतकऱ्यांसोबत असतं तर शेतकऱ्याची ही अवस्था झाली नसती. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला चांगली किंमत आहे. पण इथे ऊस आणि साखरेची निर्यात होत नाही. सरकारची शेतीबाबत योग्य नीती नाही, असंही ते म्हणाले.