डोंगरावर महादेवाच्या दर्शनाला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, दोन जण खाली उतरलेच नाहीत

| Updated on: Apr 09, 2023 | 9:41 AM

जंगलात जात असताना या भागात मधमाशांचे मोठ्या प्रमाणात पोळे आहेत. या मधमाशांच्या पोळ्यांनी पर्यटकांवर हल्लाबोल केला.

डोंगरावर महादेवाच्या दर्शनाला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, दोन जण खाली उतरलेच नाहीत
Follow us on

चंद्रपूर : नागभीड तालुक्यात सात बहिणींचा डोंगर आहे. हे एक पर्यटन स्थळ आहे. शिवाय जंगल परिसर असल्याने पर्यटक येथे भेट देतात. या जंगलात महादेवाचे मंदिर आहे. एकीकडे महादेवाचे दर्शन होते. दुसरीकडं जंगल परिसराचा आनंद घेता येतो. म्हणून पर्यटक या भागात भेट देतात. काल सुटीचा दिवस असल्याने नागपुरातील दोन कुटुंबीय या जंगलात फिरायला गेले होते. जंगलात जात असताना या भागात मधमाशांचे मोठ्या प्रमाणात पोळे आहेत. या मधमाशांच्या पोळ्यांनी पर्यटकांवर हल्लाबोल केला.

नागपुरातील दोघांचा मृत्यू

मधमाश्यांच्या हल्ल्यात २ जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी झाले. नागभीड तालुक्यातील सातबहिणीचा डोंगर येथील घटना आहे. मृतकांमध्ये नागपूर येथील अशोक मेंढे आणि गुलाबराव पोचे यांचा समावेश आहे. या दोघांचं वय अंदाजे ६० वर्षे आहे.

हे सुद्धा वाचा

जंगलात मधमाशांनी केला हल्ला

सातबहिणीच्या डोंगरावर महादेवाचे मंदिर आहे. मात्र या डोंगरावर मोठ्या प्रमाणात मधमाशांचे पोळे आहेत. काल दुपारी देवदर्शनासाठी अनेक पर्यटक गेले होते. दुपारी अचानक मधमाशांनी हल्ला केला.

रात्री दोघांचे मृतदेह खाली आणले

मात्र हा डोंगर अतिशय अवघड असल्याने दोन्ही मृतक खाली उतरू शकले नाही. मधमाशांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. रात्री ११ वाजता स्थानिक NGO च्या मदतीने मृतदेह खाली आणण्यात आले.

का केला असेल हल्ला

जंगलात परफ्यूमचा वापर केल्यास मधमाशा हल्ला करतात. या पर्यटकांनी परफ्यूमचा वापर केला होता की नाही याची पुष्टी झाली नाही. मात्र, परफ्यूमचा वापर केल्यास मधमाशा हल्ला करतात, असा अनुभव आहे. त्यामुळं जंगलात जाताना परफ्यूमचा वापर करू नये, अन्यथा मधमाशा हल्ला करतात, अशी माहिती आहे.

पर्यटन ठरले शेवटचे

नागपूरची लोकसंख्या सुमारे ३० लाख आहे. आजूबाजूला बरीच पर्यटन स्थळं आहेत. पण, नवीन आणि वेगळ्या ठिकाणी जाण्याची पर्यटकांची इच्छा होतात. नागपुरातून सहा जण जंगलात पर्यटनासाठी गेले होते. मधमाशांच्या हल्ल्यात दोन जणांना जीव गमवावा लागला. इतर चार जण जखमी झालेत. यामुळे हे दोन्ही कुटुंबीय दहशतीत आहेत.