Chiplun Flood | चिपळूणमध्ये पुराची पाणीपातळी चार-पाच फुटांनी खाली, पावसाची रिमझिम

| Updated on: Jul 23, 2021 | 8:16 AM

चिपळूण शहरात 202 मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी, भरतीची स्थिती अशा कारणांमुळे चिपळूणमध्ये 2005 पेक्षा भयानक स्थिती निर्माण झाली. चिपळूण परिसरात सध्या कुठेही विद्युत पुरवठा सुरु नसून पूरग्रस्तांची संपूर्ण रात्र अंधारात गेली

Chiplun Flood | चिपळूणमध्ये पुराची पाणीपातळी चार-पाच फुटांनी खाली, पावसाची रिमझिम
चिपळूणमधील पुराची संग्रहित दृश्यं
Follow us on

रत्नागिरी : चिपळूण शहरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पुराच्या पाण्याची पातळी ही जवळपास चार ते पाच फुटांनी खाली आली आहे. रात्रभर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी पातळी वेगाने कमी होत आहे. त्यामुळे चिपळूणवासियांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे. चिपळूणमध्ये सकाळच्या वेळात रिमझिम पाऊस सुरु आहे.

ना वीज, ना मोबाईल नेटवर्क

चिपळूण शहरात 202 मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी, भरतीची स्थिती अशा कारणांमुळे चिपळूणमध्ये 2005 पेक्षा भयानक स्थिती निर्माण झाली. चिपळूण परिसरात सध्या कुठेही विद्युत पुरवठा सुरु नसून पूरग्रस्तांची संपूर्ण रात्र अंधारात गेली. त्यातच मोबाईललाही नेटवर्क नसल्यामुळे संपर्क साधण्यास अनेक अडचणी येत आहेत.

पूरग्रस्तांना मदतीमध्ये अडचणी

चिपळूण शहरातील पूरस्थिती ओसरत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून मदत कार्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. रात्री पाण्याचा वेग खूप असल्याने मदत कार्य करता आले नाही, तर काल दिवसभर चिपळूण शहरात पूरस्थिती होती. पुराच्या पाण्याचा वेग अधिक असल्याने फायबर बोटी त्यात टिकत नाहीत. त्यामुळे पूरग्रस्तांना बाहेर काढण्याच्या कामाला गती आलेली नाही. हेलिकॉप्टरने पूरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा पालकमंत्री अनिल परब यांनी केली असली तरी काल दिवसभरात एकही हेलिकॉप्टर मदतीसाठी आले नव्हते.

चिपळूणमध्ये गुरुवारी भीषण परिस्थिती 

पुढील काही तास पावसाचा जोर ओसरला, तर चिपळुणातील पूरस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. मात्र कोळकेवाडी धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने पाण्याचा विसर्ग कधीही करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये मध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरल्याने अख्खी बाजारपेठ पाण्याखाली गेली.

याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो नागरिक पाण्यात अडकले आहेत.

(Chiplun Flood update Ratnagiri rain due to heavy rainfall water lodging in Chiplun city rivers update)