चार महिन्यांपूर्वी विवाह झाला, संशयाचे भूत मनात शिरले नि जे झाले त्याने सारेच हादरले

एक दिवस महानंदाने थंड डोक्याने कट रचला. या कटात खुशीचा घात झाला. सुखी संसाराची राखरांगोळी झाली.

चार महिन्यांपूर्वी विवाह झाला, संशयाचे भूत मनात शिरले नि जे झाले त्याने सारेच हादरले
Govinda Hatwar | Updated on: May 03, 2023 | 2:55 PM

व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : खुशी आणि महानंद यांचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले. खुशी जेमतेम अठरा वर्षांची. घरज्यांनी वर शोधला. नाही म्हणायची तिची हिंमत झाली नाही. महानंद सरकारशी तिचा विवाह झाला. त्यानंतर आनंदात दिवस जात होते. दोघेही खुश होते. पण, महानंदने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे तो तिच्या पाळतीवर होता. यावरून दोघांमध्ये घरगुती खटके उडत होते. एक दिवस महानंदाने थंड डोक्याने कट रचला. या कटात खुशीचा घात झाला. सुखी संसाराची राखरांगोळी झाली.

पत्नीला विहिरीत ढकलले

गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथे चारित्र्याच्या संशयापोटी पतीने पत्नीची विहिरीत ढकलून हत्या केली. ही घटन29 एप्रिल रोजी घडली. ती 1 मे रोजी उघडकीस आली. खुशी महानंद सरकार (वय 18) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे.


पत्नीच्या चारित्र्यावर संशय

महानंद सरकार असे आरोपी पतीचे नाव आहे. श्रीनगर येथील महानंद सरकार याचे चामोर्शी तालुक्यातील ठाकूरनगर येथील खुशी हिच्यासोबत चार महिन्यापूर्वी विवाह झाला. दोघांचा सुखी संसार सुरू असतानाच पती महानंद याने पत्नी खुशी हिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरवात केली.

पत्नी घरून निघून गेल्याचा बनाव

महानंदच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले. त्याने 29 एप्रिलला स्वतःच्या शेतातील विहिरीत पत्नी खुशीला ढकलून दिले. तसेच त्या विहिरीत कीटकनाशक सुध्दा टाकले. मुलचेरा पोलीस स्टेशन गाठून पत्नी घरून परस्पर निघून गेल्याच्या बनाव करीत तक्रार केली.

पत्नीची हत्या केल्याची कबुली

एक मे रोजी स्वतःच पोलीस ठाण्यात विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती दिली. मुलचेरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवली. आपला खाक्या दाखवताच महानंद याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर मुलचेरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. आरोपी महानंद याला अटक केली.

आता पश्च्याताप केल्याशिवाय महानंदच्या हाती काही राहिले नाही. संसाराचा आनंद घेण्याऐवजी आता त्याला जेलही हवा खावी लागणार आहे. संशयाच्या भुताने त्याला पछाडले होते. तोच भूत आता महानंदच्या मानगुटीवर बसला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us