पाणीपुरी खाल्ल्यानंतर अतिसार आणि मळमळ, गावातील तब्बल 57 जणांना विषबाधा

| Updated on: Apr 15, 2023 | 8:20 PM

गावातील लोक शुक्रवारी नेहमीच्या ठेल्यावर पाणीपुरी खायला गेले. पाणीपुरी खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर आरोग्य विभागाने गावात धाव घेतली आहे.

पाणीपुरी खाल्ल्यानंतर अतिसार आणि मळमळ, गावातील तब्बल 57 जणांना विषबाधा
नांदेडमध्ये पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा
Image Credit source: TV9
Follow us on

नांदेड / राजीव गिरी : नांदेडच्या अर्धापुर तालुक्यातील चाभरा येथील ग्रामस्थांना पाणीपुरी खाल्ल्याने लोकांना विषबाधा झाली आहे. लहान बालकांसह गावातील तब्बल 57 जणांना विषबाधा झाली असून, त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गावात नेहमीच लावण्यात येणाऱ्या पाणीपुरीच्या ठेल्यावर पाणीपुरी खाल्ल्यानंतर ही विषबाधा झाली. या सर्व रुग्णांवर गावात उपचार करण्यात आले असून, काही जणांना नांदेडला हलविण्यात आलंय. सर्वांची प्रकृती स्थिर असून, धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलंय.

बटाट्याच्या भाजीतून विषबाधा झाल्याचा अंदाज

गावात हा पाणीपुरीचा गाडा गेल्या अनेक वर्षांपासून लावला जात आहे. बटाट्याच्या भाजीतून ही विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर सर्वांना मळमळ, उलट्या आणि अतिसार सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने चाभरा, अर्धापूर आणि नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. आज सकाळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चाभरा येथे येऊन पाहणी केली. तसेच पाणीपुरी विकणाऱ्या व्यक्तीकडून पाणीपुरीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

पाणीपुरी खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी अतिसार, उलट्या, मळमळ सुरु

नेहमीच्या ठेल्यावर 14 एप्रिल रोजी चाभरा गावातील गावकऱ्यांनी पाणीपुरी खाल्ली होती. पाणीपुरी खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना मळमळ आणि उलट्या होण्यास सुरुवात झाली. काही जणांना उलट्या आणि अतिसार सुरू झाल्याने गावकरी घाबरून गेले. काही जणांना उलट्या आणि अतिसाराचे प्रमाण वाढल्याने त्यांना अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दोघांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले.

जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. संदेश कदम, डॉ. जनार्धन टारफे, डॉ. मुस्तपुरे, आरोग्य सेविका टरके, सतीश जाधव आदींनी गावातील सर्व विषबाधित रुग्णांची तपासणी केली. चाभरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 47, अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात 8 आणि नांदेड येथे खासगी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 11 लहान मुले तर 46 महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.