इंटरनेट बंद, विद्यापीठाची परीक्षा रद्द, 45 जणांना अटक; अकोला हिंसेनंतर तणाव कायम

| Updated on: May 15, 2023 | 9:40 AM

अकोल्यात हिंसा भडकल्यानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत.

इंटरनेट बंद, विद्यापीठाची परीक्षा रद्द, 45 जणांना अटक; अकोला हिंसेनंतर तणाव कायम
akola violence
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अकोला : अकोल्यात इन्स्टाग्राम पोस्टवरून झालेल्या राड्यानंतर शहरात अजूनही तणावपूर्ण शांतता आहे. शनिवारी रात्री झालेल्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 45 जणांना अटक केली आहे. एवढेच नव्हे तर सोशल मीडियातून शहरात अफवांचं पेव फुटू नये म्हणून इंटरनेट बंद करण्यात आला आहे. तसेच हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. शहरात शांतता असून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत.

अकोला येथील दंगलीनंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावतीतील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या अकोला येथील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अकोल्यामध्ये संचारबंदी असल्याने परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. अकोला शहरात होणाऱ्या 11 केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. आता जरी परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी विद्यापीठाकडून लवकरच परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती अमरावती विद्यापीठाने दिली आहे.

हे सुद्धा वाचा

असा भडकला हिंसाचार

अकोल्यात इन्स्टाग्राम पोस्टवरून दोन गटात धुमश्चक्री झाली होती. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली होती. वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. 100 बाईक स्वारांनी शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली होती.

या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. तर आठ जण जखमी झाले होते. जखमींमध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे. हा तणाव अधिकच वाढत गेल्याने पोलिसांनी अखेर शहरात 144 कलम लागू केलं. तसेच नाक्या नाक्यावर आणि संवदेनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवला होता. अमरावतीहून एसआरपीची तुकडी मागवली होती.

एकाचा मृत्यू

या हल्ल्यात विलास गायकवाड यांचा मृत्यू झाला. विलास हे इलेक्ट्रिशियन होते. सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे ही हिंसा भडकल्याचं पोलिसांनी सांगितलं. दोन गटात हाणामारी झाल्याने हवेत गोळीबार करावा लागला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

नागपूरात ‘हाय अलर्ट’

अकोला दंगलीच्या पार्श्वभूमीवर नागपूरात ‘हाय अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच नागपूरच्या संवेदनशील भागात पोलिसांची नजर आहे. सशस्त्र पोलिसांची गस्त आणि शांतता बिघडविणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याचे पोलीस आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठकही घेतली आहे.