नंदुरबार : नंदुरबारकरांसाठी (Nandurbar) एक आनंदाची बातमी आहे. यंदाच्या वर्षीचे पाण्याचे टेन्शन मिटले असून शहराला पाणी पुरवठा करणारे विरचक्र धरण 82 टक्के भरले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक्र धरणाच्या (Virchakra Dam) पाणलोट क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी (Water) पातळीत चांगली वाढ झालीयं. त्यामुळे नंदुरबारकरांच्या वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. जून महिन्यात नंदुरबारकडे पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, जुलै महिन्यात नंदुरबार जिल्हात दमदार पावसाने हजेरी लावलीयं.
नंदुरबार जिल्हात पावसाने पाठ फिरवल्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. मात्र, जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व धरण ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यातच नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे विरचक्र धरण 82 टक्के भरल्याने नागरिकांचे टेन्शन दूर झाले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही चांगला पाऊस सुरू आहे.
विरचक्र धरण भरल्यामुळे या भागातील शेतीच्या सिंचनाचा पाण्याच्या प्रश्न सुटणार आहे. तर दुसरीकडे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धरण 81 टक्के भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. नंदुरबार वासियांवर असलेलं पाणी कपातीचे संकट टळले असले तरी नागरिकांनी पाणी वापरताना काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.