भरमसाठ फी वाढीला विरोध केल्यानं शाळेनं पोस्टाने टीसी पाठवले, चंद्रपूरमधील संतापजनक प्रकार

| Updated on: Aug 30, 2021 | 4:47 PM

चंद्रपूर शहरातील 'नारायणा विद्यालयम' शाळेत भरमसाठ फी वाढीविरोधात आवाज उठवणाऱ्या 13 विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाने पोस्टाद्वारे टीसी पाठवल्याचा प्रकार समोर आलाय. यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांकडून संताप व्यक्त होत आहे.

भरमसाठ फी वाढीला विरोध केल्यानं शाळेनं पोस्टाने टीसी पाठवले, चंद्रपूरमधील संतापजनक प्रकार
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील ‘नारायणा विद्यालयम’ शाळेत भरमसाठ फी वाढीविरोधात आवाज उठवणाऱ्या 13 विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाने पोस्टाद्वारे टीसी पाठवल्याचा प्रकार समोर आलाय. यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. आज (30 ऑगस्ट) या प्रकाराविरोधात पालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात धाव घेत आपली व्यथा मांडली. मुलांच्या परीक्षा सुरू असताना झालेल्या या प्रकारामुळे शाळेवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

भरमसाठ शुल्क वाढी विरोधात आवाज उठवणार्‍या विद्यार्थ्यांना रजिस्टर्ड पोस्टाद्वारे टीसी पाठवला जाण्याचा हा प्रकार चंद्रपुरात उजेडात आला आहे. चंद्रपूर शहरातील ख्यातनाम नारायणा विद्यालयम व्यवस्थापनाने हा संतापजनक प्रकार केला. यानंतर संतापलेल्या पालकांनी थेट जिल्हा परिषद शिक्षण विभागाचं ऑफिस गाठलं.

शाळेवर मर्जीतल्या पालकांची समिती करुन फी वाढीला मंजूरीचा आरोप

या शाळेने आपल्या मर्जीतल्या पालकांची समिती (Parent Teacher Association) स्थापन करत भरमसाठ शुल्कवाढीला होकार दिला. यानंतर गेले 2 महिने पालक-शाळा संघर्ष सुरू आहे. टीसी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत येऊ दिले जाणार नाही, अशी नोटीस शाळा परिसरात लावण्यात आलीय. शाळेवर नियमानुसार कारवाई करण्याची आग्रही मागणी पालकांनी केलीय. शिक्षणाचा मूलभूत अधिकार ऐन परीक्षा काळातच हिरावून घेतल्यानं विद्यार्थीही धास्तावले आहेत.

शाळेनं उद्दामपणाची मर्यादा ओलांडली, शिभण विभागाकडून सारवासारव

या आधीही नारायणा विद्यालयम शाळेने पालकांना अशाच पद्धतीने वेठीस धरल्याने पालकांनी शिक्षण विभागाकडे मदत मागितली होती. मात्र त्यावेळी शाळेने नरमाईची भूमिका घेतली. आता तर या सर्व त्रस्त पालकांना त्यांच्या पाल्याचे टीसी पोस्टाने पाठवून उद्दामपणाची मर्यादा ओलांडली आहे. पालकांनी अन्यायाच्या विरोधात शिक्षण विभागात धाव घेतलीय. त्यानंतर आता शिक्षण विभागाने सारवासारव सुरू केली आहे. शाळेला ही कारवाई मागे घेण्याचे मौखिक आदेश देण्यात आल्याची माहिती चंद्रपूर चे माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिलीय. मात्र, शाळेवर काय कारवाई केली जाणार याबाबत कुठलीही स्पष्टता नाही.

राज्याच्या विविध भागात कोरोना काळात आधीच त्रस्त असलेल्या पालकांना आर्थिक दृष्ट्या वेठीस धरत शाळांद्वारे अशा प्रकारे अन्याय पूर्ण कारवाई केली जात आहे. शाळा व्यवस्थापनाच्या या आडमुठ्या धोरणावर राज्याच्या शिक्षण विभागाने वेसण घालण्याची गरज निर्माण झाली आहे. शाळांवर कुठलाही अंकुश नसल्याचंच या घटनेने सिद्ध केलं आहे.

हेही वाचा :

जळगावात फी न भरल्याने शाळेनं विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवलं, जि.प. सभापतींकडून कारवाईचा इशारा

शुल्क माफीच्या मागणीसाठी थेट शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यावर आंदोलन, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना अटक

शुल्क माफीसाठी ‘जनसुनावणी’ घ्या, AISF चं भर पावसात बेमुदत साखळी उपोषण

व्हिडीओ पाहा :

Narayana Vidyalayam school remove 13 student after opposing fee hike in Chandrapur