Amol Kolhe : भाजपमध्ये प्रवेश करणार का? राष्ट्रवादी सोडणार का?; अमोल कोल्हे यांनी दिलं उत्तर आणि…

सरकारचं मूल्यांकन करता येणं खरंच अवघड खरच अवघड आहे. राज्य सरकारमधील प्रत्येकाने स्वतःचे मूल्यांकन करायला हवे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करणे गरजेचं आहे. तरुणांना रोजगर द्या, नवे उद्योग आणा, असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

Amol Kolhe : भाजपमध्ये प्रवेश करणार का? राष्ट्रवादी सोडणार का?; अमोल कोल्हे यांनी दिलं उत्तर आणि...
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 15, 2023 | 1:11 PM

सातारा : आधी आभाळं बघायचं, वारं बघायचं अन् मग नांगरायला घ्यायचं… असं सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होतं. त्यामुळे अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीत अस्वस्थ असून ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी यूटर्न घेतला आहे. मी नाराज नाही यावर माझ्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील स्पष्टीकरण दिल आहे. पक्षाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्यामुळे ही चर्चा होते. पण ही वस्तुस्थिती नाही. मी बिलकूल नाराज नाही. खासदार म्हणून काम करत असताना 100 दिवस मी दिल्लीत असतो. कार्यक्रमाला उपस्थिती दिसली नाही की अशा चर्चा सुरू होतात. नाराजीच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. नाराज असण्याच कारणच नाही, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. त्यामुळे अमोल कोल्हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

2024 ला मी शरद पवार यांच्या सोबतच असणार आहे. माझ्या विषयीच्या बातम्या पेरल्या जात आहेत. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. माझ्या मतदारसंघात सगळ्यात जास्त कामे झाली आहेत. 2024 साठी शिरूर लोकसभा मतदारसंघ काही माझी जहाँगिरी नाही. पाच वर्षाची जबाबदारी मी माझ्या परिने व्यवस्थित पूर्ण करत आहे. पक्ष पुन्हा शिरूरमधून संधी देईल की नाही याबद्दल एक वर्ष अगोदर चर्चा करणं चुकीचं आहे. 2024 चा मी नक्की विचार करेन. पण आतापासून गुडघ्याला बाशिंग बांधणे हे माझ्या स्वभावात हे बसत नाही, असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.

आघाडी टिकणार

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयीही प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं काम जोरात सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नक्की टिकेल. लोकशाही सक्षम होण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी टिकायला हवी आणि 2024 ला देखील टिकेल, असं त्यांनी सांगितलं. तसेच वज्रमुठ सभा यशस्वी होत आहेत. उद्याची सभा देखील यशस्वी होइल. सत्ताधाऱ्यांनी आमच्या सभेवर टीका करण्यापेक्षा राज्यातील प्रश्न मार्गी लावावे. सत्ताधाऱ्यांनी राजकारणासाठी अकारण वक्तव्य करणे थांबावावं. महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झालं आहे. राज्यातील लोकांच्या प्रश्नावर उत्तरं द्या, असं ते म्हणाले.

हा लोकांच्या मनातील प्रश्न

केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरावरही त्यांनी भाष्य केलं. ही शंका सध्या सगळ्यांच्या मनात येत आहे. आरोप झाला की मोठी बातमी होते. पण त्याचं पुढं काय होतं हे कोणीच पाहत नाही. तो निर्दोष सुटल्याचं कुणी नाही बघत. एखाद्या नेत्यावर आरोप झाले आणि तो दुसऱ्या पक्षात गेला की त्यांची चौकशी मात्र थांबतात, हा सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी फुटणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार असल्याचं वृत्त त्यांनी फेटाळून लावलं. यात तथ्य नाही. राष्ट्रवादी फुटण्याचे काहीही कारण नाही. हे संशयाचं धुकं निर्माण केलं जात आहे. राष्ट्रवादीचे कुठलेच आमदार पक्ष सोडणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

अवमान थांबला पाहिजे

सावरकरांच्या मुद्द्यावरही त्यांनी राजकारण्यांना कानपिचक्या दिल्या. महापुरुषांचा अपमान हा शंभर टक्के थांबायला हवा. इतिहासात घडलेल्या गोष्टींचे पापुद्रे खरडून मनाला होणाऱ्या जखमा थांबवल्या पाहिजेत. सगळ्याच महापुरुषांनी राष्ट्र उभारणीसाठी फार मोठे योगदान दिलं आहे. विनाकारण या गोष्टी काढू नये. कुणीही कुणाच्या भावना दुखवता कामा नये या गोष्टी थांबवल्या पाहिजेत, असं ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us