कोणीही कायमचा शत्रू नाही, कोणीही मित्र नाही; राजकारणात चमत्कार होऊ शकतो; राधाकृष्ण विखे-पाटील यांचं सूचक विधान

| Updated on: Sep 18, 2021 | 12:59 PM

राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो. कुणीही कायमचा मित्र नसतो. त्यामुळे काहीही चमत्कार होऊ शकतो, असं सूचक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. (radhakrishna vikhe patil reaction on cm uddhav thackeray's statement)

कोणीही कायमचा शत्रू नाही, कोणीही मित्र नाही; राजकारणात चमत्कार होऊ शकतो; राधाकृष्ण विखे-पाटील यांचं सूचक विधान
radhakrishna vikhe patil
Follow us on

नगर: राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो. कुणीही कायमचा मित्र नसतो. त्यामुळे काहीही चमत्कार होऊ शकतो, असं सूचक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (radhakrishna vikhe patil reaction on cm uddhav thackeray’s statement)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंबादेतील एका कार्यक्रमात विरोधकांचा उल्लेख भावी सहकारी असा केला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी युतीचे संकेत दिले होते. आता त्यात राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उडी घेतली आहे. विखे-पाटील यांनीही सूचक विधान करून युतीच्या चर्चांना हवा दिली आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. महाविकास आघाडीची जी मोट बांधली गेली आहे. त्याला काही वैचारिक आधार नाही. सत्तेसाठी हे लोक एकत्रं आले आहेत. सत्ता नसतानाही शिवसेना-भाजपाने 20-25 वर्ष एकत्र राहून काम केलं आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे, असं विखे-पाटील म्हणाले.

ते त्यांचं व्यक्तिगत मत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल काय विधान केलं याची मला कल्पना नाही. मात्र ते त्यांचं व्यक्तिगत मत होतं. पण एक नक्की. राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणाचा मित्रंही नसतो. त्यामुळे काही चमत्कार होऊ शकतो, असं ते म्हणाले.

मुंगेरीलालचे स्वप्ने पाहू नका

यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस पक्षामध्ये नेत्यांचे एवढं अवमूल्यन होत आहे, तरीदेखील सत्तेसाठी लाचार झालेले टिकून राहतात. त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. पक्षाचं हित पाहण्यापेक्षा व्यक्तिगत हित पाहण्याकडे काँग्रेसच्या मंत्र्यांचे लक्ष आहे, तर काँग्रेसने आता मुंगेरीलालचे स्वप्न पाहू नयेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल औरंगाबादेत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनावेळी झालेल्या कार्यक्रमात मोठं विधान केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला. आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी असं विधान तुम्ही केलं. त्यामागचं नेमकं कारण काय? त्याचा काय अर्थ लावायचा? असा सवाल त्यांना पत्रकारांनी केलं. त्यावर त्यांनी पुन्हा सूचक विधान करून चर्चेचा धुरळा उडवून दिला. अर्थ तोच होता, आजी-माजी सहकारी तिथे होते आणि उद्या कोणी एकत्र आले तर भावी होऊ शकतात. सगळे म्हणजे येणारा काळच काय ते ठरवेल, असं सूचक विधान करतानाच गमती जमतीचा भाग सोडा. माझा प्रामाणिक मत आहे, राजकारण आपल्या ठिकाणी, एका पातळीवर हवं. विकृत स्वरुप नको. हल्ली विकृत स्वरुप येत आहे. ते थांबले पाहिजे. राज्यात महाविकास आघाडी, केंद्रात भाजप सरकार. आपण या मातीतील आहोत, आपआपल्या पदांचा महाराष्ट्रासाठी काय उपयोग करता येईल, ते पाहावं यासाठी मी बोललो, अशी सारवासारव मुख्यमंत्र्यांनी केली.

दानवे काय म्हणाले?

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही त्यानंतर मीडियाशी संवाद साधला होता. 25 -30 वर्ष आमची युती आहे. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी ही युती घडवून आणली आहे. अचानकपणे शिवसेनेने आमची साथ सोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले. त्यामुळे आमचं सरकार येऊ शकलं नाही. खरंतर जनतेने कौल युतीला दिला. पण सेनेने वेगळं जाण्याचा निर्णय घेतल्याने या राज्यात एक वेगळ्या प्रकारचं सरकार बनलं आहे. आता हे सरकार बनल्यावर दोन वर्षे झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काही अनुभव आला असेल या अनुभवातून ते असं बोलले असतील. खरंतर आम्ही समविचारी आहोत. आम्ही समविचारी एकत्र आलो तर या राज्यातील जनतेला सुद्धा पसंद पडणार आहे. पण भविष्यात काय घडेल सांगता येत नाही. पण जेव्हा कधी असं घडेल तेव्हा जनता खूष होईल, असंही दानवे म्हणाले होते. (radhakrishna vikhe patil reaction on cm uddhav thackeray’s statement)

 

संबंधित बातम्या:

रावसाहेब दानवे भाजपचे अध्यक्ष असताना सर्वकाही सुरळीत होतं; राऊतांचा चंद्रकांतदादांना अप्रत्यक्ष टोला

मिशन उत्तर प्रदेश, काँग्रेसची स्क्रिनिंग कमिटी जाहीर; वर्षा गायकवाड यांची समितीवर वर्णी

“उद्धव ठाकरे पुढचे तीन वर्षे मुख्यमंत्री राहणार असतील तर युतीसाठी आमची तयारी”

(radhakrishna vikhe patil reaction on cm uddhav thackeray’s statement)