एनडी पाटलांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवार म्हणाले, आमच्या बहिणीचे काही चालले नाही, तिथे आमच्या व्हिपचे काय?; काय आहे किस्सा?

| Updated on: Jan 17, 2022 | 10:54 PM

दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2019मध्ये राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांच्या हस्ते लढवय्ये नेते एनडी पाटील यांना प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

एनडी पाटलांच्या त्या विधानावर शरद पवार म्हणाले, आमच्या बहिणीचे काही चालले नाही, तिथे आमच्या व्हिपचे काय?; काय आहे किस्सा?
Professor ND Patil
Follow us on

कोल्हापूर: दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2019मध्ये राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांच्या हस्ते लढवय्ये नेते एनडी पाटील यांना प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी एनडी पाटील आणि शरद पवार यांच्यात शाब्दिक टोलेबाजी रंगली होती. मला कुणाचा व्हीप चालत नाही, असं पाटील आपल्या भाषणात म्हणाले. तोच धागा पकडत पवारांनी मिष्किल भाष्य केलं. एन. डी. पाटील आमचे मोठे मेहुणे. आमच्या बहिणीचे त्यांच्यासमोर काही चालले नाही. तिथे आमच्या व्हिपचे काय? असं शरद पवार यांनी म्हणताच एकच खसखस पिकली. एन.डी. पाटील यांचं आज निधन झालं. त्यामुळे त्यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा मिळत आहे.

काय आहे किस्सा?

कोल्हापुरात शिवाजी विद्यापाठीत हा पुरस्कार सोहळा रंगला होता. सत्काराला उत्तर देण्यासाठी एन. डी. पाटील उभे राहिले. यावेळी त्यांचे भाषण लांबल्याने त्यांची पत्नी सरोज पाटील (माई) यांनी त्यांच्या प्रकृतीच्या काळजीस्तव एक कागद देऊन त्यांना भाषण आवरते घेण्याची विनंती केली. त्यावर, याचिका चालत नाही. मला कुणाचा व्हिप चालत नाही. कुणाचा म्हणजे कुणाचा नाही, असं एनडी पाटील म्हणाले. त्यामुळे सभागृहात एकच खसखस पिकली होती. त्यानंतर शरद पवारांनीही आपल्या भाषणात तोच धागा पकडत मिष्किल भाष्य केलं.

नारायणराव हे माझे मेहुणे, माझ्या मोठ्या बहिणीचे यजमान आणि मी कुटुंबात लहान आहे. मी मंत्रिमंडळात आणि हे विरोधी पक्षनेते. त्यामुळे त्यावेळी कठिण परिस्थिती होती, असं सांगतानाच जिथं आमच्या बहिणीचा व्हिप चालला नाही, तिथं आमचा व्हिप काय चालणार? आम्ही तसा कधी प्रयत्नही केला नाही, असं पवार म्हणातच एकच हशा पिकला.

विचारांचा मधुघट कधी रिता होणार नाही

याच कार्यक्रमात पवारांनी एनडींच्या कार्याचा आढावा घेताना त्यांच्यावर स्तुती सुमनांची उधळण केली होती. यावेळी त्यांनी भा. रा. तांबे यांच्या कवितेचा दाखला दिला. यांचा (एन.डी.) दिवस कधी ढळणार नाही. विचारांचा मधुघट कधी रिता होणार नाही, अशा काव्यमय शब्दात पवारांनी त्यांचं वर्णन केलं होतं.

यावेळी एनडी पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या बांधिलकीवरही भाष्य केलं होतं. एन.डी. पाटील यांची दोन घरे आहेत. एक म्हणजे माझ्या बहिणीचे घर आणि दुसरे म्हणजे रयत शिक्षण संस्था. मात्र यातील खरं घर कुठलं हे सांगता येणार नाही, असे गौरवौद्गारही त्यांनी काढले होते.

शारदाताईंनी एनडींचा संसार उभा केला

ज्येष्ठ राजकीय पत्रकार विजय चोरमारे यांनीही पवार कुटुंब, शरद पवार आणि एनडी पाटील यांच्या नात्यावर प्रकाश टाकला. एनडी पाटील यांचे शरद पवारांचे थोरले बंधू वसंतराव पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. वसंतराव पवार हे केशवराव जेधेंचे प्रचारक असल्याने त्यांच्याशी एनडींचे संबंध होते. त्या काळात उद्धवराव पाटील, नाना पाटील यांनी त्यांचं सरोज पवारांशी लग्न ठरवलं. एनडींचा संबंध शरद पवारांशी उशिरा संबंध आला. पण वसंतराव पवार आणि अप्पासाहेब पवार यांच्याशी एनडींचे जिव्हाळ्याचे संबंध होते, असं विजय चोरमारे यांनी सांगितलं.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पवारांच्या आई शारदाबाईंसाठी एनडी पाटील हे मुलासमानच होते. सर्व घरातले शारदाताईंना आईऐवजी बाई म्हणायचे. एनडी पाटीलही जावई असले तरी त्यांना बाईच म्हणायचे. इतके त्यांचे अतूट संबंध होते. शारदाताईंचं एनडींवर फार प्रेम, फार माया होती. हा लढणारा मनुष्य आहे, चळवळीतील मनुष्य आहे, असं त्या म्हणायच्या. एन. डी. पाटील वकिली करणार नाहीत. ते चळवळीतच काम करणार आहे हे माहीत असूनही शारदाताईंनी त्यांची मुलगी एनडींना दिली. त्या काळात लग्नाला होकार दिला. त्यानंतर त्यांचा संसार उभा करायला मदत केली. मुलाचा संसार उभा करावा अशी व्यक्तिगत मदत त्यांनी केलीय. त्यामुळे हे त्यांचं जिव्हाळ्याचं नातं अधोरेखित होतात, असंही चोरमारे यांनी सांगितलं.

ते पथ्य कायम पाळलं

सरोज ताईंनी (एन.डी. पाटील यांच्या पत्नी) त्यांना राजकीय, सामाजिक कार्यासाठी पाठिंबा दिला. तुम्ही चळवळी करा. पण घरातला पैसा मागायचा नाही, असा एक त्यांचा सुप्त करार होता. चळवळीच्या कामानिमित्त एनडी पाटलांना अनेकदा बाहेर जावं लागायचं. कधी उस्मानाबाद तर कधी कुठे… रात्री-अपरात्री फोन आला की ते निघायचे. त्यामुळे अनेकदा तर ते शेजाऱ्यांकडून उसने पैसे घ्यायचे. पण घरातून पैसे घ्यायचे नाहीत. शेवटपर्यंत त्यांनी हे पथ्य पाळलं, असं चोरमारे यांनी सांगितलं.

सर्वाधिक टीका पवारांवर केली

शरद पवार आणि एनडींनीही राजकारण आणि व्यक्तिगत संबंध वेगळे ठेवले. त्याचं कारण म्हणजे एनडी पाटील हे विरोधी पक्षात होते आणि पवार सत्ताधारी होते. काही काळ पुलोदचा अपवाद सोडला तर एनडी सतत विरोधात होते. एनडी पाटलांनी आपल्या राजकीय आयुष्यात सर्वाधिक टीका कुणावर केली असेल तर ती शरद पवारांवर. त्यांनी पवारांवर अतिशय कठोर टीका केली. त्याबद्दल पवार कुटुंबानेही त्यांना कधी विचारलं नाही आणि त्यावरून त्यांच्यात कधी गैरसमजही झाले नाहीत. ज्या ज्या वेळी राजकीय भूमिका त्यांच्याकडे आल्या मग एनडी असो की पवार दोघांनीही या राजकीय भूमिका निष्ठेने पार पाडल्या. हे खूप वेगळं रसायन होतं. व्यक्तिगत संबंध आणि राजकीय संबंध किती प्रगल्भ असतात याचं उदाहरण म्हणून महाराष्ट्राने या नात्याकडे बघायला हवं, असंही ते म्हणाले.

एनडींशी चर्चा करूनच निर्णय

पुलोदच्या मंत्रिमंडळात एनडी आणि पवार एकत्र होतं. शेतकरी कामगार पक्षाचे नेते म्हणून ते सहकार मंत्री म्हणून मंत्रिमंडळात होते. मंत्री असताना दोघांमध्ये कधी वाद झाला नाही. उलट महत्त्वाच्या मुद्द्यावर पवार एनडींशी चर्चा करून निर्णय घ्यायचे. कापूस एकाधिकार योजना महाराष्ट्रात लागू झाली. त्यावेळी एनडींनी आऊट ऑफ बॉक्स जाऊन दिल्लीपर्यंत जात मोरारजी देसाईंना भेटून ही योजना अंमलात आणली. एनडी नियमाने चालणारे होते. त्यामुळे दोघांमध्ये कधी वितुष्ट आलं नाही. रयत शिक्षण संस्थेत दोघांनीही 30-40 वर्ष एकत्रं काम केलं. तिथेही वाद झाला नाही. रचनात्मक काम करण्यावर दोघांचा भर होता. पवारही पुरोगामी असल्याने वाद झाला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

RIP ND Patil | ‘आबाsss न्याय मिळायला पाहिजे’ असं एनडी पाटील आरआर पाटलांवर का ओरडले होते?

ND Patil Passed Away | प्रामाणिक लोकनेत्याला मुकलो; सीमाभागातील मराठी भाषकांचा आधारवड कोसळला…!

ND Patil Passed Away | एन. डी. पाटील यांच्या निधनाने शेतकरी, कष्टकऱ्यांबद्दल आस्था असलेला तत्त्वनिष्ठ नेता हरपला; पवारांसह मान्यवरांची श्रद्धांजली

N. D. Patil dies: मंत्री असूनही मुलाच्या इंजीनियरिंग प्रवेशासाठी वशिला लावला नाही, स्वत:चे कपडे स्वत:च धुवायचे; एन. डी. पाटलांचे तीन किस्से?