शिक्षिकेचं शिक्षणमंत्र्यांना पत्र, वारंवार धडकणाऱ्या आदेशांनी होतंय शैक्षणिक नुकसान

| Updated on: Sep 17, 2022 | 6:06 PM

वैशाली गेडाम यांनी दाखवलेल्या धाडसाचं राज्यभरातून शिक्षक कौतुक करीत आहेत. हे पत्र शासनविरोधी नसून, शिक्षणाच्या भल्यासाठी आहे. त्यामुळं मला कुणालाही घाबरण्याची गरज नाही, असंही वैशाली गेडाम सज्जडपणे सांगतात.

 शिक्षिकेचं शिक्षणमंत्र्यांना पत्र, वारंवार धडकणाऱ्या आदेशांनी होतंय शैक्षणिक नुकसान
शिक्षिकेनं शिक्षणमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल
Follow us on

चंद्रपूर : शिक्षकांवर शैक्षणिक कार्य सोडून अवांतर कामांचा बोजा लादण्यात आला. त्यामुळं शिक्षक विद्यादानाचं कार्य प्रामाणिकपणे करू शकत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे, अशी खंत वैशाली गेडाम नामक एका शिक्षिकेनं व्यक्त केलीय. त्या चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम जिवती तालुक्यात गोंडगुडा इथल्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. शिक्षणमंत्री (Education Minister), शिक्षण सचिव (Education Secretary) आणि शिक्षण संचालकांना त्यांनी लिहिलेलं दीर्घ पत्र सध्या समाजमाध्यमात चांगलंच व्हायरल होत आहे.

या पत्रात त्यांनी एकूणच शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी योजलेले उपक्रम, शाळा आणि विद्यार्थ्यांचे केले जाणारे मूल्यांकनावर प्रकाश टाकलाय. शिक्षकांवर रोज येऊन आदळणारी शासकीय परिपत्रके, त्यातून विद्यादानात होणारे दुर्लक्ष अशा विविध प्रश्नांवर मत व्यक्त करण्यात आली. यात सुधारणा करण्याची मागणी केलीय.

सध्या या पत्रामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अध्ययन स्तर निश्चितीसारखे प्रकार कोणत्या तज्ज्ञाने संशोधित केले. यावर प्रश्न उपस्थित करून, शिकवणारी यंत्रणाच जर अवांतर कामांना जुंपली जात असेल तर गुणवत्ता कशी वाढणार? शिक्षकांना शिकवण्याचं स्वातंत्र्य नसेल, शिक्षकांमधील गुणवत्ता दाबून ठेवणाऱ्या योजना आणल्या जात असतील, तर शैक्षणिक गुणवत्ता वाढणार कशी, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

हे सुद्धा वाचा

शिक्षकांनी शाळेत काय करावं, हे शासनानं न सांगता पर्यवेक्षण करावं. शिक्षक शाळेत योग्य शिकवतात की नाही, वेळेवर येतात की नाही, व्यसन करतोय का, गैरहजर असतो काय, त्यांची वागणूक कशी आहे, याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे. पण असं काहीच होत नाही.

रोज नवे उपक्रम, रोज नवे परिपत्रक, रोज नवनव्या लिंक भरणं, यातच शिक्षकांचा वेळ वाया जातोय. यातून शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल, असा खडा सवाल त्यांनी शासनाला केलाय. सध्या या पत्राची मोठी चर्चा सुरू आहे.

वैशाली गेडाम यांनी दाखवलेल्या धाडसाचं राज्यभरातून शिक्षक कौतुक करीत आहेत. हे पत्र शासनविरोधी नसून, शिक्षणाच्या भल्यासाठी आहे. त्यामुळं मला कुणालाही घाबरण्याची गरज नाही, असंही वैशाली गेडाम सज्जडपणे सांगतात.