आगामी वादळाच्या दृष्टीने शेतकऱ्यांची विशेष काळजी घ्यावी, औरंगाबादेत अजित पवार यांचे निर्देश

अजित पवार म्हणाले की, 17 आणि 18 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या परतीच्या पावसाच्या अनुषंगाने विशेषत: लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याबाबत सूचना कराव्यात.

आगामी वादळाच्या दृष्टीने शेतकऱ्यांची विशेष काळजी घ्यावी, औरंगाबादेत अजित पवार यांचे निर्देश
मराठवाड्यातील अतिवृष्टीसंबंधी आढावा बैठकीत औरंगाबाद येथे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार.
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 11:00 AM

औरंगाबाद: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीसंदर्भातील आढावा बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) शनिवारी औरंगाबाद येथे होते. प्रत्येक जिल्हा प्रशासनाने (Aurangabad District) जिल्ह्यातील नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पुर्ण करुन मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करावे, त्याचप्रमाणे या संकटात खचून गेलेल्यांना धीर देऊन योग्य मदत वेळेत करावी असे निर्देश दिले.

येत्या 17 व 18 ऑक्टोबरच्या अतिवृष्टीची तयारी ठेवा

बैठकीत बोलतांना अजित पवार म्हणाले की, 17 आणि 18 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या परतीच्या पावसाच्या अनुषंगाने विशेषत: लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याबाबत सूचना कराव्यात. याचबरोबर मराठवाड्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी विभागीय पातळीवर आढावा घेऊन लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. रब्बी हंगामासाठी पीक कर्ज पुर्नगठण करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल तसेच खरीप हंगासाठी दिलेली 994 कोटी रुपयांची रक्कम पीक विमा कंपनीला दिली असून ती तात्काळ वितरीत करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी.

नांदेड: हेक्टरी 20 हजारांची मदतीची मागणी- अशोक चव्हाण

नांदेड जिल्ह्यात जून ते ऑक्टोंबर या दरम्यान 143% इतका पाऊस झाला असून अतिवृष्टीने बाधित क्षेत्राकरिता 419 कोटी इतकी रक्कम देय असून कोल्हापूरच्या धर्तीवर प्रतिहेक्टरी 20 हजार रुपये इतकी मदत मिळावी अशी मागणी करत सार्वजनिक बांधकाम तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यात मृत जनावरांकरीता 31 लाख, मृत व्यक्तींकरीता 36 लाख, घरांची झालेली पडझड व इतर बाबींकरीता 80 लाख रकमेची गरज असल्याचे सांगून शासनाकडून 80% रक्कम मदत म्हणून देणे अपेक्षित असल्याचे सांगितले. पायाभूत सुविधांच्या नुकसानी करीता 486 कोटी इतकी रक्कम देण्याची मागणी केली.

औरंगाबादः 346 कोटीची आवश्यकता- सुभाष देसाई

औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बोलतांना म्हणाले की, जिल्ह्यात 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्याने जिल्ह्यात एकूण 669 कोटींचे नुकसान झाले असून पायाभूत सुविधा नष्ट झाल्याने 346 कोटीची आवश्यकता आहे. अतिवृष्टीमुळे नदी, तलावांच्या जलसाठ्यामधील पाणी दुषित झाले असल्याने पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करणे गरजेचे आहे. खरीप पिकांचे तर नुकसान झालेच त्याचबरोबर रब्बीच्या पिकाकरीता जमीन पुर्ववत करण्यासाठी देखील निधीची आवश्यकता लागणार आहे.

जालना व बीडसाठीही मदतीची मागणी

जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून या ओल्या दुष्काळात मजूरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना रेशन उपलब्ध करुन देण्याची मागणी आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केली. तर बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीचे पात्र बदलले असून विशेष बाबी अंतर्गत मदतीची मागणी सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

आठ जिल्ह्यांतील नुकसानीचे केंद्रेकरांकडून सादरीकरण

विभागीय आयुक्त् सुनील केंद्रकर यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात झालेल्या जून ते ऑक्टोंबर या कालावधीत झालेल्या पावसाचे प्रमाण, पेरणी, नुकसान, प्रत्यक्ष पाहणी केलेले अहवाल याचे सादरीकरण करुन आवश्यक असलेल्या निधीची मागणीबाबत संगणकीय सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर बैठकीत सादर केले. यामध्ये जीवीतहानी तसेच पायाभूत सुविधांच्या नुकसानीबाबत माहिती दिली. यासाठी आवश्यक असलेल्या जिल्हानिहाय निधीची मागणी केली. मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांनी पालिका हद्दीत झालेल्या नुकसानीबाबत तसेच खाम नदीच्या संरक्षक भिंतीचे झालेले नुकसान याबाबत संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली व आवश्यक निधीची मागणी केली.

इतर बातम्या- 

पूल, रस्ते गेले, 36 लाख हेक्टरवरील पीक पाण्यात, मराठवाड्यात तब्बल 4 हजार कोटींचं नुकसान

Weather Alert: काळेकुट्ट ढग अजूनही हटेनात, दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता  

Follow Us