आधी कोरोना, मग अतिवृष्टी अन् आता करपा रोग…! नुकसान सहन होत नसल्याने शेतकऱ्याने कापली केळीची दीड हजार झाडे

| Updated on: Sep 26, 2021 | 4:13 PM

सध्या केळी पिकाला करपा रोगाने ग्रासले आहे. त्यातच पडलेले भाव यामुळे केळी पिकाचा लागवडी खर्च सुद्धा निघणे दुरापास्त झाले आहे. परिणामी केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

आधी कोरोना, मग अतिवृष्टी अन् आता करपा रोग...! नुकसान सहन होत नसल्याने शेतकऱ्याने कापली केळीची दीड हजार झाडे
आधी कोरोना, मग अतिवृष्टी अन् आता करपा रोग...!
Follow us on

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील केळी उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांवर एकामागून एक संकट येत असून जणू संकटाची मालिकाच सुरू आहे. अगोदरच अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यातच आता नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळीवरही करपा रोग आल्यामुळे केळीचा भाव मातीमोल झाला आहे. त्यामुळे केळीचे लाखोंचे नुकसान होणार आहे. हे नुकसान सहन होत नसल्याने देळूब ( बु.) येथील एका तरूण शेतकऱ्याने शेतातील दीड हजार केळीची उभी झाडे कापून टाकत आपला संताप व्यक्त केला आहे. (The farmer cut down one and a half thousand banana trees as he could not bear the loss)

आधी कोरोनामुळे आता अतिवृष्टीमुळे शेतकरी बेजार

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात विविध पिके संकटात सापडली आहेत. अशाही परिस्थितीत आलेल्या संकटाना तोंड देत शेतकरी जीवन जगत असताना आता अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतातील उभ्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने पिके संकटात सापडली आहेत. सध्या केळी पिकाला करपा रोगाने ग्रासले आहे. त्यातच पडलेले भाव यामुळे केळी पिकाचा लागवडी खर्च सुद्धा निघणे दुरापास्त झाले आहे. परिणामी केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

काढणीस आलेल्या केळीच्या बागा होताहेत उद्धवस्त

अर्धापूर तालुक्यातील सर्वच भागात काढणीस आलेल्या केळीच्या संपूर्ण बागाच्या बागा शेतात पिकून उद्धवस्त होत आहेत. तर उर्वरित केळीला कवडीमोल भाव मिळत आहे. यामुळे संतप्त झालेल्या अर्धापूर तालुक्यातील देळुब (बु.) येथील युवा शेतकरी शैलेश लोमटे यांनी आपल्या शेतातील दीड एकर क्षेत्रावरील केळीचे पीक कोयत्याने तोडून भुईसपाट केले आहे. या प्रकारामुळे हतबल झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून अर्थिक मदतीची अपेक्षा आहे. मात्र शासन या शेतकऱ्यांना मदत देईल काय ? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

तात्काळ पंचनामे करुन मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी

दरम्यान माझ्या शेतातील दीड हजार केळीची जोपासना करण्यासाठी मला आतापर्यंत एक लाख रुपयांचा लागवड खर्च झाला. पिकातून तीन लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु अचानक केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काढणीस आलेली केळी मोठ्या प्रमाणात झाडावरच पिकत आहे. तर कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे केळीचा लागवडीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे एक एकर शेतातील दीड हजार केळीची झाडे कापून टाकली आहे. या प्रकाराला शासनाने गांभीर्याने घेऊन केळीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकरी शैलेश लोमटे यांनी केली आहे. नांदेड, अर्धापूर, मुदखेड व भोकर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. पण सद्यस्थितीत केळी उत्पादक शेतकरी संकटाच्या गर्तेत सापडला आहे. विशेष म्हणजे हे सर्व तालुके पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात येतात. त्यामुळे येथील केळी उत्पादक शेतकरी वेळोवेळी केळी पिकाच्या अडचणी संदर्भात पालकमंत्री यांना भेटीसाठी वेळ मागत आहेत. (The farmer cut down one and a half thousand banana trees as he could not bear the loss)

इतर बातम्या

मनमोहन सिंगांऐवजी काँग्रेसनं शरद पवारांना पंतप्रधान केलं असतं तर देशाचं, महाराष्ट्राचं राजकारण कसं असतं?

Video | वरात मंडपात आली अन् मेहुण्यांनी अडवले, पैसे मागताच नवरदेवाने दिले भन्नाट उत्तर, व्हिडीओ व्हायरल