जळगावमध्ये तुफान पावसानं शेतकरी दाम्पत्य बैलगाडीसह पुरात वाहून गेलं, बैलांचा मृत्यू, शेतकरी बेपत्ता

| Updated on: Jul 15, 2021 | 8:45 PM

मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतातून बैलगाडीने घरी परतणारं एक दाम्पत्य जळगावमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे गावात शोककळा पसरली.

जळगावमध्ये तुफान पावसानं शेतकरी दाम्पत्य बैलगाडीसह पुरात वाहून गेलं, बैलांचा मृत्यू, शेतकरी बेपत्ता
Follow us on

जळगाव : मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतातून बैलगाडीने घरी परतणारं एक दाम्पत्य जळगावमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेले. ही धक्कादायक घटना आज (15 जुलै) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील निंभोराच्या खैरी नाल्यात घडली. यात बैलगाडीतील महिला बचावली आहे, मात्र पती पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं बेपत्ता झालाय. बैलगाडीच्या दोन्ही बैलांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही.

भागवत भिका पाटील (वय 55) आणि त्यांच्या पत्नी मालुबाई भिका पाटील (वय 50) असं या शेतकरी दाम्पत्याची नावं आहेत. निंभोरा येथील रहिवासी असलेले हे दोघे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास निंभोरा परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पाटील दाम्पत्य बैलगाडीने घरी परतत होते. याच वेळी मुसळधार पावसामुळे निंभोरा ते खामखेडा या दोन्ही गावांच्या दरम्यान असलेल्या खैरी नाल्याला मोठा पूर आला. नाल्याच्या पुराचा अंदाज न आल्याने भागवत पाटील यांनी बैलगाडी नाल्यात उतरवली. मात्र, नाल्याला आलेला पूर मोठा असल्याने बैलगाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली.

“भागवत पाटील व दोन्ही बैल पाण्यात दूरपर्यंत वाहत गेले, मालूबाई झुडुपांमुळे बचावल्या”

या घटनेत मालुबाई पाटील या बचावल्या आहेत. पुराच्या पाण्यात बैलगाडी वाहून गेल्यानंतर त्या नाल्याच्या काठावर असलेल्या झुडुपांमध्ये अडकल्या. मात्र, भागवत पाटील व दोन्ही बैल पाण्यात दूरपर्यंत वाहत गेले. त्यामुळे दोन्ही बैलांचा बुडून मृत्यू झाला. वाहून गेलेले भागवत पाटील हे बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. संपूर्ण गावकरी भागवत भिका पाटील हे सुरक्षित असावे यासाठी प्रार्थना करत आहेत. भागवत यांचा शोधासाठी पोलिसांसह आख्ख गाव शोध मोहिम राबवत आहे.

काटेरी झुडपांनी गंभीर जखमी मालुबाईंवर उपचार सुरू

भागवत भिका पाटील हे गावातील अतिशय साधे आणि शांत व्यक्ती असल्याचं नागरिकांनी सांगितलं. त्यामुळे संबंधित घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. ओढाला अचानक पूर आल्याने बैलगाडीसह भागवत आणि त्यांच्या पत्नी वाहून गेले. भागवत यांच्या पत्नी मालुबाई ओढ्याच्या कडेपासून थोड्या जवळ होत्या. त्यामुळे त्या ओढ्याच्या प्रवाहात वाहत जाऊन एका बाभळीच्या झुडपात अडकल्या. त्यांच्या शरीराला मोठ्या प्रमाणात काटे टोचले गेले आहेत. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना ओढ्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आला.

हेही वाचा :

Video | मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर, चरायला गेलेल्या जाफराबादी म्हशी गेल्या वाहून, एकीचा मृत्यू

VIDEO: Himachal Pradesh flood : धर्मशाळेत ढगफुटी, प्रलयकारी पुरात अनेक वाहनं वाहून गेली

बुलडाण्यात ढगफुटीसदृश पाऊस, नदी-नाल्यांना पूर, धरणाच्या भिंतीवरून पाणी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

व्हिडीओ पाहा :

Two farmers with bullock cart trap in flood in Nimbhora Dharangaon Jalgaon